
साने गुरुजी जयंती….

खरा तो एकचि धर्म ! जगाला प्रेम अर्पावे…

जगाला प्रेम अर्पण करणे हाच धर्म आहे अशी शिकवण साने गुरुजींनी दिली… आज आपण वृथा धर्माच्या बेगडीत अडकून पडलो आहोत… यातून बाहेर पडणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

” श्यामची आई” या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरी मधून आई आणि मुलाच्या प्रेमाचं प्रेममय विवरण केलं आहे.
हळव्या मनाचे गुरुजी , गांधीजींच्या विचारसरणीने जगले.. गुरुजींनी सुद्धा सत्य आणि अहिंसा हीच मूल्ये जगाला शिकवली… कारण हीच मूल्ये चांगला भारत घडण्यासाठी आवश्यक आहे असे त्यांना वाटते…
“बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ”
भारत मातेवर पुत्रवत प्रेम करणारा हा संवेदनशील मनाचा माणूस… राष्ट्रकार्यासाठी काम करतो.
गुरुजींचे साहित्यलेखन मोठ्या प्रमाणात आहे. मानवता, साहित्यिक विषयक ,सामाजिक ,कलेविषयी असे विपुल लेखन केले आहे.
“स्थापना शांती समता ठेवुनी शुद्ध साधना ! करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना”
“साधना” या साप्ताहिकाचे ते पहिले संपादक राहिले आहेत. आजही “साधना” हे साप्ताहिक गुरुजींचे , गांधींचे विचार घेऊन ,लोकप्रबोधन आणि सामाजिक भान निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. साधनेच्या प्रत्येक अंकावर साने गुरुजींचा फोटो व वरील ओळी आहेत.

आपण ,लहान होतो तेव्हा एसटी (लालपरी)बसच्या पाठीमागे साने गुरुजींची कविता होती.. सोबत त्यावर गुरुजींचा एक फोटोही होता… ती कविता अर्थात त्यांनी शेतकऱ्यांविषयी लिहिली होती…

“आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान”
नंतर नंतर ही कविता गडप झाली … कवितेच्या जाग्यावर अंबुजा सिमेंट आले, तेही गेले आणि जगाने व्यवहारवाद स्वीकारला…
“जगी जे हीन अतिपतीत ,
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे”
समाजातील जे हीन, दलित वर्ग आहे यांना जागरूक करण्याची भूमिका त्यांच्या काव्यातून समजते. अशा लोकांना जागृत करणे हीच गोष्ट ते महत्त्वाची मानतात. आणि हे कार्य करत राहणे हाच मानवता धर्म असल्याचे सांगतात.
हे लेखन खूप तोकडे असून गुरुजींचे स्मरण करावे म्हणून ही शब्दसुमनांची ओंजळ वाहतो आहे.
संकलन शब्दांकन — प्रा.अमोघसिध्द चेंडके