अक्कलकोटच्या ५०० कोटींच्या विकास आराखड्याला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार
सत्कार समारंभ

अक्कलकोटच्या ५०० कोटींच्या विकास आराखड्याला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार
अक्कलकोट, प्रतिनिधी : अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन अक्कलकोटसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल चे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अक्कलकोटच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. श्री स्वामी समर्थांची पावन नगरी असलेल्या अक्कलकोटचा पर्यटन, धार्मिक, नागरी सुविधा आणि पायाभूत विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी या विकास आराखड्यामुळे मोठी संधी निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अक्कलकोटच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ नगरीचा विकास नव्या उंचीवर पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज तथा बंटी राठोड, ज्येष्ठ नगरसेवक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, नगरसेवक यशवंत तात्या धोंगडे, महेश हिंडोळे, सुनील सिद्धे, प्रविण शहा, सद्दाम शेरीकर, शिवराज स्वामी, न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, क्रियाशील सदस्य मनोज निकम, आशपाक काझी, महांतेश स्वामी आदी उपस्थित होते.
अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून मिळालेली ही मोठी चालना असून, ५०० कोटींच्या विकास आराखड्यामुळे अक्कलकोट शहराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



