भक्तीच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनाची भव्य पालखी व रथ मिरवणुकीने सांगता
वर्धापन विशेष

भक्तीच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनाची भव्य पालखी व रथ मिरवणुकीने सांगता
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
“अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…!”, “सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…!”, “श्री अन्नपूर्णा माता की जय…!” अशा भक्तिमय जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित भव्य पालखी व रथ मिरवणूक बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी व सुशोभित रथाची मिरवणूक विधिवत पूजन करून मार्गस्थ करण्यात आली. रिमझिम पावसातही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
मिरवणुकीत स्वरांजली बँड पथक (लालबाग, मुंबई), आराध्य ढोल पथक (चुनाभट्टी, मुंबई), नादब्रह्म ढोल-ताशा पथक (पुणे), केरळचे पारंपरिक वाद्य पथक, हलगी पथके, ध्वज पथके, संभळ, लेझीम संघ तसेच श्री हनुमानाचा देखावा यामुळे मिरवणुकीची आकर्षक शोभा वाढली. अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी भरत मित्र मंडळ, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, पुणे नगरसेवक संदीप खर्डीकर, उद्योजक श्री रेघे (मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून सुरू झालेली मिरवणूक नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कारंजा चौक, समाधी मठ, सुभाष गल्ली, गुरु मंदिर आदी प्रमुख मार्गाने पुन्हा अन्नछत्र मंडळात परतली. समाधी मठात आरती झाल्यानंतर अंतिम आरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
पालखी व रथ फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते. पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्थांकडून प्रसाद वाटप करण्यात आले. शहरात स्वागत कमानी, डिजिटल बॅनर्स उभारण्यात आले होते. संपूर्ण मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी करून श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.
या सोहळ्याचे नियोजन संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. राज्यासह परराज्य आणि परदेशातून आलेल्या स्वामी भक्तांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. अन्नछत्र मंडळाच्या शिस्तबद्ध आणि भव्य आयोजनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी, संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांनी पालखी व रथाचे विधिवत पूजन केले. सचिव शामराव मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट : मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शुभेच्छा संदेश
राज्य मंत्री (केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार) ना. मुरलीधर मोहोळ यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देताना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व पदाधिकारी, सेवेकरी व भाविकांचे अभिनंदन केले. गुरुपौर्णिमा उत्सव समाजात श्रद्धा, संस्कार आणि सद्भावनेचा संदेश देणारा असून अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट : लालबागच्या स्वरांजली बँडची पालखीला मानवंदना
गुरुपौर्णिमेच्या दिवशी लालबाग, मुंबई येथील ख्यातनाम स्वरांजली बँड पथकाने श्री स्वामी समर्थांच्या पालखीला विशेष मानवंदना दिली. लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवात सेवा देणारे हे बँड पथक यंदा विशेष निमंत्रणावर अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
चौकट : भर पावसातही ढोल पथकाची दमदार कामगिरी
आराध्य ढोल पथक, चुनाभट्टी (मुंबई) यांनी मुसळधार पावसात प्लास्टिकचे आच्छादन घेऊन आपले सादरीकरण सुरू ठेवले. अनेक स्वामी भक्तांनी पथकावर आच्छादन धरून सहकार्य केले. त्यांच्या या समर्पणाचे उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

