Akkalkot: स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलोय – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

अक्कलकोट (प्रतिनिधी): जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील वटवृक्ष मंदिर होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी दर्शनाचा लाभ मिळतो याची प्रचिती स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेल्या भाग्यवान स्वामी भक्तांना येते याची आपणाला माहिती मिळाली आहे. या अनुशंगाने स्वामीकृपेचा ध्यास घेवून अक्कलकोटी आलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी भाविकांच्या स्वामी दर्शन अनुभूती बद्दल बोलताना मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार, दत्ता शिंदे, शिवकुमार स्वामी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, संजय पाटील, देवस्थानचे सेवेकरी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
