अक्कलकोटमध्ये ११ दिवसांचा भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव
उषाताई मंगेशकर, आर्या आंबेकर, नितीन बानुगडे-पाटील, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती

अक्कलकोटमध्ये ११ दिवसांचा भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव; उषा मंगेशकर, आर्या आंबेकर, नितीन बानुगडे-पाटील, आदेश बांदेकर यांची उपस्थिती
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोटच्या वतीने ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दि. १९ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. १९ जुलै रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा शुभारंभ होणार असून, त्यानंतर ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या “रंग उषेचे” या सांगीतिक कार्यक्रमाने सांस्कृतिक पर्वाची सुरुवात होईल.

महोत्सवादरम्यान कन्नड गायक राजेश कृष्णन, प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान, गायिका आर्या आंबेकर यांचा “स्वर आर्या” कार्यक्रम, “फोक आख्यान”, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन, भरत जाधव एंटरटेन्मेंटचे “श्रीमंत दामोदरपंत” हे नाटक, आदेश बांदेकर प्रस्तुत “खेळ मांडियेला”, संस्कृती बालगुडे यांचा नृत्याविष्कार “संभवामि युगे युगे” तसेच श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी यांचा भक्तिसंगीत कार्यक्रम रंगणार आहे.
दि. २६ जुलै रोजी “अक्कलकोट १० के भक्ती रन” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ३, ५ आणि १० कि.मी. गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. राज्यभरातील धावपटूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमा दिनी (२९ जुलै) श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण, नामस्मरण, गुरुपूजा, महाआरती, महानैवेद्य आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी व रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, लालबागचा राजा स्वरांजली बँड यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.
उत्सवादरम्यान रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, बेटी बचाओ-बेटी पढाओ यांसारख्या सामाजिक जनजागृती उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
न्यासामार्फत निराधारांना मोफत महाप्रसाद सेवा, कुस्तीपटूंना खुराक किटचे वाटप, विद्यार्थ्यांना १० हजार वह्यांचे वितरण तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देश-विदेशातील श्री स्वामी समर्थ भक्तांनी या भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी होऊन दर्शन, सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे.



