Hinjewadi IT Park : ६ सप्टेंबरला हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ; खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी विरोधात हिंजवडीकर एकवटले

हिंजवडी (प्रतिनिधी ) : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील दयनीय रस्ते, दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या पायाभूत सुविधांविरोधात आता आयटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ (FITE) यांनी येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी हिंजवडीत मोठे आंदोलन आणि महामोर्चा काढण्याची हाक दिली आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज-१ येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो हिंजवडी चौकात समाप्त होणार आहे. या आंदोलनासाठी परिसरातील तब्बल २५० आयटी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच ८० गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंजवडी आयटी हबमधून शासनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही परिसरातील मूलभूत सुविधांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. खड्डेमय रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि रोजची जीवघेणी वाहतूक कोंडी यामुळे लाखो आयटी कर्मचारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्यातच काम पूर्ण होऊनही मेट्रो सेवा सुरू होण्यास होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दररोज तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने कामकाजासह नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होत आहे.
गेल्या वर्षीही याच प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप अपेक्षित बदल झालेला नसल्याचा आरोप ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’कडून करण्यात येत आहे.
६ सप्टेंबरच्या महामोर्चात मोठ्या संख्येने आयटी कर्मचारी आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर हे आंदोलन निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


