वागदरीत तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे दुर्गंधी; नागरिक त्रस्त, बंदिस्त गटारे पूर्ण करण्याची मागणी
ग्रामीण भागातील समस्या

वागदरीत तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे दुर्गंधी; नागरिक त्रस्त, बंदिस्त गटारे पूर्ण करण्याची मागणी
वागदरी (ता. अक्कलकोट) : वागदरी गावात अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारांमध्ये सांडपाणी साचून राहत असल्याने सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
गावातील बंदिस्त गटारांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण राहिली आहेत, तर काही भागात अद्याप बंदिस्त गटारेच करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उघड्या गटारांमध्ये घरगुती सांडपाणी तसेच शौचालयांचे पाणी सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
गटारांमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे डासांसह विविध कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी डेंग्यू, हिवताप, गॅस्ट्रो आदी संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून तुंबलेली गटारे स्वच्छ करावीत, नियमित साफसफाईची व्यवस्था करावी तसेच अपूर्ण राहिलेली बंदिस्त गटारांची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



