Akkalkot: विनाअनुदानित महाविद्यालयांनी परिस स्पर्श योजनेचा लाभ घ्यावा – प्राचार्य डॉ. दत्तात्रय सुत्रावे

अक्कलकोट (प्रतिनिधी): विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विकासासाठी राज्य शासनाने परिस स्पर्श योजना कार्यान्वित केली आहे. त्याचा लाभ घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयांनी ज्ञात मानांकनासाठी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ दत्तात्रेय सुत्रावे यांनी व्यक्त केले.


महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील आय क्यू एसी विभागाने आयोजित केलेल्या नॅक मानांकन कार्यशाळेत संसाधन व्यक्ती म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ अनमोल वळसंगे तसेच नॅक समन्वयक प्रा. राजशेखर पवार उपस्थित होते.


पुढे ते म्हणाले की विनाअनुदानित महाविद्यालयाकडे पुरेसा शिक्षक स्टाफ असतो, व्यवस्थापन परिषदेकडून आर्थिक पाठबळ मिळते, शैक्षणिक व समाजाभिमुख कार्यक्रम देखील केले जातात, परंतु ते व्यवस्थित संगणक प्रणाली द्वारे मांडणे आवश्यक असते ही कला आत्मसात केली तर नॅक ला सामोरे जाणे काहीच अवघड नाही.
प्रा डॉ अमोल वळसंगे म्हणाले , की नॅक बेंगलोर ने आपली जुनी प्रणाली बंद केली असून नवीन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार महाविद्यालयाचे नॅक मानांकन करणे खूपच सोपे झाले आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयांनी नॅक चा दर्जा प्राप्त केला पाहिजे.
प्राचार्य भरमशेट्टी म्हणाले, की शिक्षकांनी आत्मीयतेने सहकार्य केल्यास नॅक मानांकन करणे शक्य होते. त्यासाठी दृढ आत्मविश्वास आवश्यक आहे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार प्राध्यापिका मनीषा शिंदे यांनी मानले. कार्यशाळेत प्रा शिल्पा धूमशेट्टी, प्रा जनाबाई चौधरी, प्रा शितल फुटाणे, प्रा विद्या बिराजदार, प्रा प्राची गणाचार्य, प्रा नेहा गंदमल, विठ्ठल यरगल, महेश जोगदे आदी उपस्थित होते.