शिरवळवाडी–सदलापूर परिसरातील महसूल अधिकाऱ्याचा मनमानी कारभार; शेतकरी त्रस्त, बदली व कारवाईची मागणी
शिरवळवाडी–सदलापूर परिसरातील महसूल अधिकाऱ्याचा मनमानी कारभार; शेतकरी त्रस्त, बदली व कारवाईची मागणी
वागदरी/प्रतिनिधी :
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी व सदलापूर येथे कार्यरत महसूल अधिकारी दिगंबर आंदेलवाड यांच्या मनमानी, कामचुकारपणा व उद्धट वर्तनामुळे परिसरातील शेतकरी अत्यंत त्रस्त झाले असून, शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकारी प्रत्येक कामासाठी सर्रास पैशांची मागणी करत असल्याचे अनेक ठोस आरोप समोर आले आहेत. नवीन नोंद धरण्यासाठी ३ ते ५ हजार, वारसा नोंदणी, खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी ५ ते १० हजार, तर अतिवृष्टीचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या केवायसी व फार्मर आयडी अप्रूवलसाठी ५०० ते १००० रुपये इतकी मागणी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा आरोप असा की, जे ‘अर्थपूर्ण व्यवहार’ करतात त्यांचीच कामे तत्काळ केली जातात, तर पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार अक्कलकोटला चकरा मारायला लावले जाते. एखादा साधा दाखला-उतारा मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.
महसूल अधिकाऱ्याने नेमणुकीच्या गावांना दोन-दोन महिने भेट न देता अक्कलकोटमध्येच भाड्याची खोली कार्यालय म्हणून वापरत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामे महिनोन् महिने प्रलंबित राहिली आहेत.
अतिवृष्टी पंचनाम्यातही मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत असून, पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना जास्त लाभ, तर पैसे न दिलेल्यांना अत्यल्प किंवा लाभातून वगळले गेल्याचे उदाहरणे पुढे येत आहेत.
मोबाईलवर संपर्क साधला असता, अधिकारी आंदेलवाड शेतकऱ्यांशी उद्धटपणे बोलतात, “काय करायचं ते करा, कुठे जायचं तिथे जा” अशा भाषेत उत्तर देतात, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या सर्व प्रकाराला कंटाळून शिरवळवाडी व सदलापूर येथील ग्रामस्थांनी महसूल अधिकारी दिगंबर आंदेलवाड यांच्या तत्काळ बदलीची आणि कठोर चौकशीसह कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. माननीय तहसीलदारांनी तातडीने लक्ष घालून या अधिकाऱ्याला लगाम घालावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सोन्या बापू शिरगापुरे (शेतकरी, शिरवळवाडी) यांनीही या आरोपांची पुष्टी करत कारवाईची मागणी केली आहे.



