गावगाथा
शेखर खंडेराव फराटे लिखित ‘पारावरच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
पुस्तक प्रकाशन

शेखर खंडेराव फराटे लिखित ‘पारावरच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
अहमदनगर प्रतिनिधी:- (संतोष शिंदे)
मांडवगण फराटा सारख्या ग्रामीण भागातील मुलाने लेखक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कादंबरी, कथासंग्रह लिहिणे ही बाब खूप अभिमानास्पद आहे. लेखक हा नेहमीच वस्तुस्थिती मांडून समाजात चांगले विचार पेरण्याचे काम करत असतो. लेखक हा आयुष्यात सगळी पात्रं अनुभवत असतो. पुस्तक लिहण्याचे काम एका दिवसात होत नाही. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. तरुणांनी अधिकाधिक वाचन करावे. असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार उत्तमआण्णा भोंडवे यांनी केले.
पेरणे (ता. शिरुर) येथे शेखर खंडेराव फराटे लिखित ‘पारावरच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शेखर फराटे म्हणाले की, आई वडिलांचा आशीर्वाद बरोबर असेल तर आपण नक्कीच प्रत्येक गोष्टीत यश संपादन करू शकतो. आई वडिलांना कधीही नाराज करू नका. त्याचप्रमाणे पुस्तके का वाचावीत याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. वाचनातूनच लिखाणाची कला अवगत होत असते. असेही त्यांनी सांगितले. शरदजी पाबळे यांनी सांगितले की, गावातून जेव्हा लेखक तयार होतो तेव्हा गावाचे देखील नाव होते. लिहीलेली पुस्तके केव्हाही कालबाह्य होत नसतात.
शेखर फराटे लिखित पारावरच्या गोष्टी या पुस्तकाचे प्रकाशन संत तुकाराम स्पर्धा परीक्षाचे संस्थापक उत्तमआण्णा भोंडवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बापू फराटे होते. तसेच या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदजी पाबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी व्याख्याते कुंडलिक कदम, व्याख्याते संतोष परदेशी, नानासाहेब गावडे, संदीप ढमढेरे, खंडेरावआण्णा फराटे, उदमले सर, सा. ना.काळे, एकनाथ फराटे, सुभाष ढवळे, विठ्ठल वळसे, आकाश भोरडे, तात्यासो ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मनोहर परदेशी यांनी केले. तसेच आभार निलम फराटे यांनी मानले.