पुस्तकाचे नाव- मामाच्या मळ्यात
प्रकार- बालकवितासंग्रह
कवी- सचिन बेंडभर
प्रकाशक- दिलीपराज प्रकाशन, पुणे
पाने – 52
किमत – 130 रुपये
आवृत्ती.. 19 फेब्रुवारी 2023
——————————-
मुलांचे ज्ञानाबरोबरच मनोरंजन करणारा काव्यसंग्रह : मामाच्या मळ्यात
प्रत्येकांच्या बालवयात आनंदाचा केंद्र बिंदू म्हणजे ‘मामा’. मामा म्हणजे तक्रार करण्याचं केंद्र, मामा म्हणजे लाड करून घेण्याचं तसेच हठ्ठ पुरवून घेण्याचं ठिकाण. याच मामाला मळ्याचे शेत असेल, तर उन्हाळी सुट्ट्यांतील आनंद विचारायलाच नको. मामाच्या लडीवाळ प्रेमासह रानमेव्याचा मनमुराद आनंद घेताना झालेला आनंद गोकुळातील सवंगड्याच्या आनंदापेक्षा कमी नसतो. या बालवयातील आनंदाच्या स्वच्छ, निखळ झर्याची अनुभूती देणारा ‘मामाच्या मळ्यात’ हा बाल कवितासंग्रह घेवून लेखक सचिन बेंडभर बाल वाचकांच्या भेटीला आले आहेत.
या कविता संग्रहातील बहुतांश कवितेत निसर्ग बहरलेला आहे. बहरलेल्या संस्कारमय निसर्गातून मुलांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न बेंडभर यांनी केला आहे. मुलांच्या मनात निसर्गाविषयी उत्सुकता असते. त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी मुले धडपडत असतात. निसर्ग खुप काही मानवाला देतो? मात्र निसर्ग संवर्धनासाठी आपण काय करतो? असा प्रश्नही नकळतपणे कवीने उपस्थित केला आहे. त्यामुळेच बेंडभर यांची कविता मुलांना आपली वाटते. शब्दांच्या माध्यमातून मुलांच्या मनाचा ठाव घेणे, ही बेंडभर यांच्या कवीतेची ताकद आहे. ‘मामाच्या मळ्यात’ या कविता संग्रहामुळे मुले आणि बेंडभर यांच्यातील संवादाची वाट अधिक दूरपर्यंत जाणारी आहे.
मामाच्या मळ्यात, तो विजयाचा स्वामी, पाऊस, बाळ तुझं दाखव मला, दुनिया करा रे एक सारी, पावसाचे गाणे, चिंटू, माझे आजोबा, सोन्या माझा गुणाचा, प्रयत्नाने मिळते यश, तळ्यात, मळ्यात, कोल्हा काकडीला राजी, वृक्षारोपण, पाळणाघर, सुखाचा अर्थ, संकल्प आदी कविता आशयपूर्ण व वाचणीय आहेत. मुलांतील स्पर्धा, त्यातील जय, पराजयाविषयी कवीने सकारात्मक भाष्य केले आहे. नात्यासह प्राण्यांची ओळख करून देवून कवीने मानवी जीवन व्यापक होण्यासाठी सर्वच घटक महत्त्वाचे असल्याचे मुलांच्या मनावर अधोरेखित केले आहे. जागतिक तपमान वाढीला आळा घालण्यासाठी वृक्षारोपन करा, असा संदेश देवून पाळणा घरातील मुलांच्या भावनाही त्यांनी शब्दांतून प्रकट केल्या आहेत. सद्य:स्थितीत समाजात मानवता आणि एकतेला तडा जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली असताना बेंडभर यांनी एकतेचा संदेश देत संपूर्ण जगच एक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, त्यांना सकारात्मक दृष्टि प्राप्त होण्यासाठी मामाच्या मळ्यात हा कवितासंग्रह उपयुक्त ठरणार आहे. कविता, कवितेचा आशय उत्तम आहे. अंतर्गत सजावट आणि आतील रेखाटणे बोलकी आहेत. आशयघन मुखपृष्टामुळे कवितासंग्रह अधिक उठावदार झाला आहे.
——————————-
समीक्षक : संजय ऐलवाड
कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!