गावगाथा दिवाळी अंकाबाबत प्रतिक्रिया देताना वाचक प्रेमी लिहितात…… गावगाथा दिवाळी अंकाची दर्जेदारपणाची हॅटट्रीक – दिपक गुंडये

सतत दोन वर्ष उत्कृष्ट दिवाळी अंकाची निर्मिती करणार्या संपादक धोंडप्पा नंदे सलग तिसर्या वर्षी ‘गावगाथा’ हा उत्तम दिवाळी अंक साहित्यिक फराळ म्हणून वाचकांसमोर पेश केला आहे. मिळवलेले यश टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते आणि त्यात सातत्य राखणेही तेवढेच महत्वपूर्ण असते. पहिल्याच दिवाळी अंकाला मिळालेली वाचक पसंती आणि परिक्षक पसंती सलग दुसर्या वर्षीही कायम राहिल्यामुळे धोंडप्पा नंदे यांनी तिसर्यांदा ‘गावगाथा’ दिवाळी अंकाचा घाट घातला आणि तो वाचल्यानंतर त्यांची दिवाळी अंकनिर्मितीची धडपड सार्थकी लागली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


दिवाळीत प्रकाशित होणारे दिवाळी अंक विविध विषयाला वाहिलेले असतात. वैशिष्ट्यपूर्ण विषयनिवडीमुळे काही अंकांना दरवर्षी मागणी असते. गावगाथानेही दिवाळी अंकांच्या या मांदियाळीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन वाचकपसंतीवर आपला ठसा उमटविला आहे. ‘नाळ आपल्या मातीशी… नातं गावाकडच्या माणसाशी…’ असे सूत्र असलेला यंदाचा ‘गावगाथा’ दिवाळी अंक ‘ग्रामीण जीवन’ हा विषयगाभा कायम राखून प्रकाशित झाला आहे. सलग तिसर्या वर्षी ग्रामीण संस्कृती दर्शवणारे मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. त्यासाठी चित्रकार सत्यजीत वरेकर कौतुकास पात्र ठरतात.


संपादकीय मनोगतात धोंडप्पा नंदे यांनी म्हटल्याप्रमाणे दिवाळी अंक काढणे तितके सोपे काम नाही, पण हौसेला मोल नसते आणि साहित्य सेवा करण्याच्या हेतूने एक मराठी माणूस म्हणून दिवाळी अंक काढण्याची प्रचंड हौस त्यांना आहे. या हौसेपोटीच त्यांनी काढलेला ‘गावगाथा’ मागच्या वर्षी सातासमुद्रापार लंडन येथे पोहोचला याचे त्यांना समाधान आहे. आर्थिक गणिते सांभाळणे कठीण काम असल्यामुळे दिवाळी अंकाचे स्वागत प्रत्येकाने दिवाळी अंक विकत घेऊन आणि इतरांनीही भेट देऊन दिवाळी अंक निर्मात्यांचा आर्थिक भार हलका करावा अशी अपेक्षाही ते या मनोगतात स्पष्ट करतात.
गावगाथातील लेख, कथा, कविता, ललित लेख गावच्या मातीशी असलेली नाळ आणि गावाकडच्या माणसाशी असलेलं नातं अधोरेखित करतात. ‘भाषिक सीमेच्या उंबरठ्यावर या अंकातील पहिल्याच लेखात लेखक श्रीधर लोणी आपली मातृभाषा आणि आपण राहतो तेथील परिसर भाषा शिकण्याचे महत्व सांगतात. बहुभाषिक असल्यामुळे बोलीभाषा संकुचित होण्याचा आणि त्या नष्ट होण्याचा धोका टाळता येऊ शकतो असा महत्त्वाचा सल्ला ते या लेखातून देतात. माहेरवाशिन या कथेतून कथाकार समीर गायकवाड यांनी बायडाबाईच्या संघर्षाची कहाणी मांडली आहे. गणिताचे सार या कथेतून कथालेखक दिलीप कजगांवकर यांनी अर्धदृष्टी असतानाही आपले शिक्षण पूर्ण करुन नंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एका गणिताच्या शिक्षकाचा जीवनप्रवास रेखाटला आहे. पोरकी या कथेतून लेखक राजेंद्र चौधरी यांनी परदेशात नोकरी करणार्या मुलांच्या पालकांची व्यथा मांडली आहे. दिव्या अव्यक्त प्रेमकहाणी, यशोमती , काय झालं?, घे रुप चंडिकेचे, गैरसमज, वस्ती, आपुलकी, बहिष्कृत या कथाही वाचनीय आहेत.
गोंधळी नाटकाची परंपरा जपणार्या वागदरी येथील चव्हाण बंधूविषयीचा धोंडप्पा नंदे यांचा लेख वागदरीतील एका ऐतिहासिक ठेव्याची ओळख करुन देतो. मी महाराष्ट्राची लाडकी लालपरी या लेखातून मारुती शिंदे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांचे दळणवळण सोपे करण्यासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात मोलाची भूमिका बजावणार्या एसटी बसचा प्रवास वर्णन केला आहे. सातारा जिल्ह्यातील रहमतपूर या छोट्या गावात बालपण गेलेल्या कैलाश काटकर यांनी सायबर सुरक्षेतील महाकाय कंपनी ‘क्विक हिल’ची स्थापना केली. मच्छिंद्र ऐनापुरे यांनी सांगितलेली त्यांची यशोगाथा ‘अॅंटीव्हायरस ब्रॅंड बनवतो तेव्हा..’ तरुणांना जिद्द आणि मेहनत यांचे महत्त्व शिकवणारी आहे. इतरही लेख वाचनीय आहेत.
काव्यस्पंदन या विभागातील कविताही छान आहेत. गावचं लहानपण या कवितेतून कवयित्री श्रीमती नीला पाटणकर यांनी लहानपणी अनुभवलेलं नाती जपणार गाव समोर आणलं आहे. ‘गाव आता उबगल्यासारखं झालं’ या कवितेतून कवी सुनील दौलत खोडके यांनी बदलत गेलेल्या गावाची व्यथा मांडली आहे. इतरही कविता अर्थपूर्ण आहेत.
गावगाथा दिवाळी अंक सर्वच बाबतीत छान जमून आलाय. पण मुद्रणदोषाची छोटीशी काळी किनारही आहे. त्यावर लक्ष द्यायला हवे होते. पुढच्या वेळी लक्षपूर्वक काम करुन मुद्रणदोषाच्या चुका टाळाव्यात. सकस साहित्यामुळे गावगाथावर यंदाही पुरस्काराची मोहोर उमटेल ही खात्री वाटते. संपादक धोंडप्पा नंदे यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
🔏 दीपक गुंडये . मुंबई