Akkalkot: समाजातील सर्व घटकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे – मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी..

अक्कलकोट (प्रतिनिधी): संत गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा विरुद्ध बंड पुकारले, दांभिकतेवर प्रहार केला, त्यामुळे जन सामान्यात जागृती निर्माण झाली. त्यांनी स्वच्छता अभियानाचा देखील पुरस्कार केला. आता शासनाने सुद्धा स्वच्छता अभियान चळवळ कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक तसेच समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन स्वच्छ, निर्मल नवभारताची निर्मिती करावी, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.


महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राजशेखर पवार, प्राध्यापिका शितल झिंगाडे भस्मे, उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, शहर व ग्रामीण परिसरात पर्यटकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे नागरिकांकडून कमालीची अस्वच्छता होत आहे. प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. अशा स्थितीत संत गाडगे महाराज यांचे स्वच्छता अभियानाचे विचार कृतीत उतरवणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत अभियान ही केंद्र सरकारची संकल्पना संत गाडगे महाराजांच्या विचारामधूनच साकार झाली आहे. या अभियानामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी झाले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्राची गणाचारी यांनी केले सूत्रसंचलन प्रा शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले तर आभार प्रा मधुबाला लोणारी यांनी मानले.