लोकशाहीचे पवित्र मंदिर संसद भवनात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी खासदार डॉ अजित गोपछडे यांची मागणी
मागणी निवेदन

लोकशाहीचे पवित्र मंदिर संसद भवनात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी खासदार डॉ अजित गोपछडे यांची मागणी
तसे पत्र देऊन केली मागणी मा संसदीय कार्य केंद्रीय मंत्री मा किरण रिजीजू यांना महात्मा बसवेश्वर यांचा पवित्र ग्रंथ देऊन केला सन्मान व सत्कार

महात्मा बसवेश्वर यांना “विश्वगुरु”,”भक्तिभंडारी” आणि “बसव” या नावांनी ओळखले जाते, जे त्यांच्या विचारसरणीच्या व्यापकतेचे व प्रभावाचे प्रतीक आहे. बाराव्या शतकातील या महान संत आणि समाजसुधारकांनी लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची स्थापना करून समाजाला समानतेचा संदेश दिला. त्यांनी जाती, धर्म, वर्ग यावर आधारित भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीस समान संधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला आणि लोकशाहीसाठी एक दृढ पाया घातला.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या पायाभरणीच्या प्रसंगी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वर यांचे स्मरण करत भारतीय लोकशाहीच्या प्राचीन जडणघडणीवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, जिथे जग लोकशाहीचा प्रारंभ ‘मॅग्नाकार्टा’पासून मानते, तिथे भारतीय संस्कृतीत लोकशाहीचे मौल्यवान व प्राचीन उदाहरण म्हणजे महात्मा बसवेश्वर यांची “लोकसंसद” आहे.

महात्मा बसवेश्वर यांनी लोकसंसद स्थापन करून सर्व समाजघटकांना विचार मांडण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला – जाती-धर्मभेद न करता – समतोल न्याय देण्याची हमी होती. त्यांनी प्रबोधनाद्वारे केवळ समाजात बदल घडवून आणला नाही, तर आधुनिक लोकशाहीचे अधिष्ठानही घातले.

महात्मा बसवेश्वर यांचे योगदान केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हते, तर सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातूनही त्यांनी एक नवा विचार समाजाला दिला. त्यांच्या शिकवणींमुळे लोकशाही मूल्यांची मुळे अधिक मजबूत झाली.

भारतीय लोकशाहीच्या या महान अध्वर्यूंच्या स्मृतीसाठी संसद भवन परिसरात त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना हा एक गौरवशाली उपक्रम ठरेल. यामुळे महात्मा बसवेश्वर यांनी दिलेले समानता, न्याय आणि लोकशाहीचे तत्त्व समाजात दृढ होईल आणि त्यांच्या कार्याचा अभिमान प्रकट होईल.
म्हणूनच, भारत सरकारकडे विनंती करतो की महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी गंभीर विचार करून त्वरित निर्णय घ्यावा व त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करावा. असे पत्र डॉ अजित गोपछडे यांनी मा मंत्री महोदय यांना दिले व मा.पंतप्रधान याना विनंती करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती केली आहे