श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन
मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून होणार मिरवणूक

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन
मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून होणार मिरवणूक
पुणे, ता. ११ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट) येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे बुधवारी (ता. १२) पुण्यात आगमन होत आहे. यानिमित्ताने सायंकाळी सहा वाजता मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त १६ मार्चपर्यंत महापालिकेजवळील काँग्रेस भवनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ ।

हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ होईल.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट पुणेचे संस्थापक-अध्यक्ष वीरेंद्र किराड यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण १६ मार्चला होईल. या वेळी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहतील. पालखी सोहळ्यात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी ७ वाजता तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करतील. शुक्रवारी

(ता. १४) सायंकाळी सात वाजता लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, ऑर्केस्ट्रा साई सातसूर परिवार, सांस्कृतिक मंच यांचा ‘साई सातसूर’ कार्यक्रम होईल. शनिवारी (ता. १५) सायंकाळी सात वाजता मुकुंद बादरायणी ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ कार्यक्रम सादर करतील. त्यानतंर दुसऱ्या दिवशी सायंकाळी आठ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामिगीत सुगंध’ कार्यक्रम सादर होईल. अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
