पुणेकरांनो, जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय बघा, आतापासूनच पाणी जपून वापरा
पाणी नियोजन

पुणेकरांनो, जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय बघा, आतापासूनच पाणी जपून वापरा
सूर्य आग ओकू लागला, धरणे आटू लागली, पावसाचा भरवसा काय?

पुणे, दि. १५ मार्च २०२५ :- आता कुठे उन्हाळा सुरू झाला आहे. पण आतापासूनच सूर्य तीव्र आग ओकू लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी दिवसेंदिवस आटू लागले आहे. परिणामी धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आपल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या किती पाणी उरले आहे, बघा आणि आतापासूनच पाणी जपून वापरायला सुरुवात करा. अन्यथा आपल्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हेही तेवढेच सत्य आहे.

सध्या उन्हाळ्याचा पहिलाच महिना सुरू आहे. परंतु आतापासूनच उन्हाच्या वाढू लागल्या आहेत. त्यातच आताच जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागणार , हे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

सध्या, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून शहराला आगामी अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला आवश्यक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या जून महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ १५.५५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे पाच टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ अडीच महिने म्हणजेच मे महिन्याच्या शेवटापर्यंत पुरेल इतकाच आहे. परिणामी ममहिन्याच्या अखेरीस शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पाणी टंचाईचा सामना टाळण्यासाठी पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या वृत्तास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला सुमारे २१ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७५ टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्यात येत असतात.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती (टीएमसीमध्ये)
– या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा — २९.१५ टीएमसी
– सध्या उपलब्ध असलेला साठा — १५.५५
– शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) — १४.६१ टीएमसी
– प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) — सुमारे २१ टीएमसी
जलसंपदा विभागाने केलेले पाणी वाटप नियोजन (वार्षिक)
– पुणे शहराला पिण्यासाठी पाणी — १४.६१ टीएमसी
– बाष्पीभवन व वहनव्ययाने कमी होणारे पाणी — २.९० टीएमसी
– दौंड शहर व ग्रामीण भागासाठी लागणारे पाणी — ०.९६ टीएमसी
– सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी — १०.५४ टीएमसी
खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात गतवर्षीच्या पाणीसाठा)
– टेमघर — ०.४४ टीएमसी (०.३७)
– वरसगाव — ७.५९ (७.५०)
– पानशेत — ६.१३ (५.९२)
– खडकवासला — १.३९ टीएमसी (१.०३)
– एकूण — १५.५५ टीएमसी (१४.८२)
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये
उरले ९५.८६ टीएमसी पाणी
दरम्यान , पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता.१५ ) फक्त ९५.८६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ४८.३३ टक्के इतके आहे. हा उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत ३४.६१ टक्के होता. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील उजनीतील उपयुक्त पाणीसाठा २४.०२ टीएमसी इतका शिल्लक राहिला आहे.
गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ६८.६६ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील आजचा उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात गतवर्षीचा आजचा पाणीसाठा)
– पवना — ४.५० (४.४३)
– चासकमान — ३.३९ (३.०४)
– भामा आसखेड — ४.२६ (४.२६)
– भाटघर — १४.६२ (११.१९)
– नीरा देवघर — ५.४२(४.५०)
– वीर — ४.३९ (४.४६)
– माणिकडोह — १.४४(२.७०)
– डिंभे — ५.८७(६.३७)
यंदा उन्हाची तीव्रता जास्त दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता वाढली की, धरणांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो. यामुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होते. या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
पांडूरंग कटके
धरण पाणीसाठा अभ्यासक