गावगाथा

महापे येथील राममंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

दिन विशेष

महापे येथील राममंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात किर्तन, भजन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन श्रीराममंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर खूप जुने असून मागील ३४ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सन १९९२ साली सुरू केलेली परंपरा त्यांच्या चंद्रकांत, भगीरथ, प्रभाकर, भानुदास, देविदास ह्या त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. गेल्या २६ वर्षांपासून गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी) यांचे हरिकीर्तन या ठिकाणी श्री राम नवमीच्या दिवशी आयोजित केले जाते. या वर्षीदेखील हभप पांडुरंग महाराजांचे श्री राम जन्मोत्सवावर सुश्राव्य कीर्तन झाले व त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री रामनवमी या हिंदू सणात भगवान रामाचा सन्मान केला जातो. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. रावणाच्या राजवटीतून जगाला मुक्त करण्यासाठी भगवान रामाची निर्मिती झाली. प्रभू राम त्यांच्या कठोर जीवनशैलीमुळे मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखले जात होते. श्री राम नवमीची थोडक्यात पौराणिक कथा अशी की, त्रेतायुगात दशरथ नावाचा राजा होता, त्यांना तीन बायका (कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी) होत्या. ते निपुत्रिक असल्याने भविष्यात अयोध्येवर कोण राज्य करणार याची चिंता त्यांना होती. प्रख्यात ऋषी वशिष्ठांनी त्यांना बालसंतान यज्ञ करण्याचा सल्ला दिला. या यज्ञप्रदर्शनाची विशेष विनंती ऋषिश्रृंगाने केली होती. यज्ञ संपल्यानंतर त्यांना यज्ञदेवतेकडून पवित्र खीरची वाटी मिळाली. त्यांनी तिन्ही महिलांना वाटीतील पवित्र खीर दिली. काही दिवसांनी खीर खाल्ल्यानंतर सर्व राण्यांना गर्भधारणा झाली. चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी दुपारच्या सुमारास कौसल्येने श्री राम यांना, कैकेयीने भरताला आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न नावाच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. भगवान विष्णूचे सातवे स्वरूप, भगवान राम हे कौशल्येचे पुत्र होते आणि अधर्माचा उच्चाटन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर आले. भगवान रामाने आपल्या अनुयायांना दुष्टांच्या हल्ल्यापासून वाचवताना संपूर्ण पृथ्वीवरील अन्याय दूर करून पृथ्वीवर धर्माची स्थापना केली. त्याने रावणासह सर्व राक्षसांचाही नायनाट केला. अयोध्येतील लोक नवीन राजा मिळाल्याबद्दल आनंदी होते, म्हणून ते दरवर्षी त्यांच्या राजाचा वाढदिवस राम नवमी म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू लागले, ही प्रथा आता भारतभरातील हिंदूंनी पाळली आहे. रामनवमीचा दिवस हिंदूंना खूप महत्वाचा आहे. संपूर्ण भारतभर ही पूजा मोठ्या उत्साहात साजरी करतात. असे असले तरी, ही रामनवमीची पूजा अयोध्येमध्ये, जेथे भगवान श्री राम यांचा जन्म झाला, तेथे मोठ्या धूमधडाक्यात साजरा केली जाते. श्रीराम यांना त्यांच्या जीवनातील चारित्र्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम हे नाव देण्यात आले. वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांनी राजवाड्यातील सुखसोयींचा त्याग केला आणि जंगलातील जीवन स्वीकारले. या अर्थाने, हा दिवस साजरा करण्यामागे श्री रामांचे परिपूर्ण, त्यागमय, संघर्ष, मर्यादापूर्ण जीवन, दृष्ट व संहारक प्रवृत्तींना संपवणारे जीवन भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा देखील उद्देश आहे. श्री राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहत प्रभू रामांचे दर्शन घेतले. यावेळी पाटील कुटुंबियांच्या वतीने किर्तनकार व समवेतच्या साथकरी वारकऱ्यांचा सन्मानदेखील करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button