गावगाथा

तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व : कै. सौ. रुपालीताई इंगळे (वहिनीसाहेब)

पुण्यतिथी विशेष

तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व : कै. सौ. रुपालीताई इंगळे (वहिनीसाहेब)

नश्वर मानवी जीवन इतरांच्या कल्याणार्थ कार्यासाठी व्यतीत करण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे याचे सार्थ उदाहरण म्हणजे येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा मा. नगराध्यक्ष /नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती कै. रूपालीताई इंगळे (वहिनीसाहेब) यांनी व्यतीत केलेले जीवन कार्य होय. कै. सौ. रूपालीताई इंगळे यांना बालवयातील शालेय जीवनापासून शिक्षणासोबतच इतरांना मदत करणे, निराधार गोरगरीबांना मायेचा घास भरविणे, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आसपासच्या गरजूंना संकटकाळात आवश्यक ते मदत करून त्यांना मानसिक धीर देणे, प्राणीमात्रांवर दया मायेचा वरदहस्त ठेवून माणुसकीची वागणूक देणे इत्यादी छंद जोपासून जीवनाची सुरुवात केली होती. हे करताना जीवनात आपल्या कार्याप्रती तत्व व निष्ठा असली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. आपले शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या पुढील जीवनातही त्यांनी आपल्या तत्वांना नेहमीच प्राधान्य दिले.

तुमच्या पवित्र स्मृतीची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी, तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळतो आमच्या जीवनी.

या त्यांच्या जीवनशैलीवरील काव्यरचनेप्रमाणे आम्हाला आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवर्णीना कुठलीच तोड नाही. काहीजण जीवन मार्गातून कधीच जाऊ नये असे काही व्यक्तीमत्व असतात, त्यापैकीच त्या काळी सर्वांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. सौ. रूपालीताई इंगळे, त्यांच्या स्मृती ताज्या झाल्या की नेहमीच वाटते कै. सौ. रुपालीताई ह्या धार्मिक मनोवृत्तीच्या होत्या. त्या भक्ती मार्गातील एक महान पूजक होत्या. त्या नेहमी भारतीय संस्कृतीतील देव देवतांची पूजा, विधी, उपवास, नामस्मरण करीत असत. भगवान गणेश, मारुती, महादेव, खंडोबा, सौंदत्ती यल्लमा देवी, येथील श्री स्वामी समर्थ महाराज, पंढरीचे पांडुरंग अशा अनेक विविध देवदेवतांचे त्या भक्त होत्या. याशिवाय त्या अनेक धार्मिक गुरुजनांची तन-मन-धनाने सेवा करीत असत. विविध सण उत्सवाच्या प्रसंगी स्वामीजींना, गुरुजनांना घरी बोलावून विधिवत पूजा करून भक्तिमय वातावरणात परिवारासह इतरांनाही भक्तीमय आनंद देण्याचा त्यांचा हा सुस्वभाव होता. त्या

स्वतः उच्च विद्याविभूषित होत्या, म्हणून त्यासोबत त्यांचे चिरंजीव प्रथमेश महेश इंगळे यांनाही त्यांनी बालवयापासूनच सुसंस्काराचे धडे दिले. त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून त्यांना चांगले व आदर्श शिक्षण दिले. चि. प्रथमेश यांना शांत, संयमी त्याचबरोबर जबाबदारीची शिकवण दिली. त्यांना जीवन महात्म्याची जाणीव घडवून देवून मानसिक व शारीरिक दृष्ट्या बलवान बनवीत आदर्श माता ठरल्या. घर एक मंदिर आहे असे मानून जगातील सर्वाधिक सुख आणि समाधान आपल्या घरात नांदतो याचा कधीही हेवा न बाळगता आपल्या समाधानी वृत्तीनेच त्यांनी आपले सासू-सासरे, पती, मुलगा, पाहणे, नातेवाईक, सासर माहेर व मित्रमंडळी यांच्याकडील आप्तेष्ट व अन्य आप्तेष्टांना सन्मानाची सेवापूर्वक वागणूक देऊन सर्वांच्या आनंदातच आपले आनंद मानत त्यांनी जगलेले जीवन म्हणजे महापुण्यकार्य आहे असे नेहमीच वाटते.

धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व कै. सौ. रुपालीताई इंगळे यांचे यजमान महेश कल्याणराव इंगळे यांना त्यांच्या सर्वांगीण कार्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहून कुटुंबाच्या जबाबदारीतूनही अनमोल सहकार्य केले. त्यांना त्यांच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथील इंगळे कुटुंबीयांच्या पिढीजात स्वामी सेवेसह त्यांना विविध क्षेत्रात कार्य करण्यास बहुमूल्य वेळ देऊन आपले पती परमेश्वर या भावनेने महेश इंगळे यांना नेहमीच मानसिक पाठबळ दिले.

निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. ज्या

निसर्गाकडून मानवी गरजा पूर्ण होत असतात, त्या निसर्गाकडे कै. सौ. रुपालीताई इंगळे यांनी निसर्गाचे ऋणी आपले हे जीवन या उद्देशाने पाहीले. त्यांच्या हसापूर येथील शेतमळ्यात विविध जातीचे झाडे व फळझाडे लावून त्या वृक्षांचे संवर्धन करून जतन केले, त्यामुळे जणू त्यांना निसर्ग संवर्धन दूत असेही म्हटले तरी त्यांच्याप्रती ही बिरुदावली यथायोग्य आहे. पशु, पक्षी, प्राणी यावर त्यांची नितांत श्रद्धा व आस्था होती. शेतमळ्यात पाखरांकरिता योग्य असे खाद्य आहाराचे नियोजन करणे, गाय, बैल यांच्याकरिता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये योग्य अशा आहाराची व्यवस्था करून प्राणीमात्रांचे उत्तम पालन पोषण करून त्यांची सेवा करीत असत. आपल्या घरात व शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांना तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व देवस्थानशी निगडित असलेल्या सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांना बंधू भगिनींची वागणूक देत आपल्याच परिवारातील आहेत असे समजून त्यांना योग्य वेळी अडीअडचणीच्या काळात धनदौलत, विविध साहित्य, गरजे प्रसंगी अन्नधान्य इत्यादी मदत करीत असत. परिसरातील नागरिकांच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेत त्यांना वेळोवेळी औषधोपचार पुरविणे, वैद्यकीय, आरोग्यविषयक कामासाठी आर्थिक मदत करणे इत्यादी सेवाभावातून त्यांच्यातला आनंद पाहत असत. त्यांच्या निष्ठा तत्त्व या पुढील पिढीसाठी नेहमीच आदर्शवादी राहतील. शरीराने आज जरी त्या आमच्यात नसल्या तरी आपल्या विचारांनी व तत्वनिष्ठ धोरणात्मक जगलेल्या जीवनशैलीमुळे त्या आमच्या सदैव सोबतच आहेत. आपल्या स्मृती सदैव अजरामर

राहतील.

।। तुमचं अस्तित्व म्हणजे आम्हांस मार्गदर्शन होतं ।। ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं ।। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे ।। पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे ।।

आपल्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच आपल्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त

श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना व आपल्या पवित्र स्मृतीस भावपुर्ण आदरांजली.

शब्दांकन –

प्रा. शरणप्पा उर्फ शिवशरण, अचलेर व श्रीशैल चंद्रकांत गवंडी, अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button