अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा ‘कॉरिडॉर’ धर्तीवर सर्वांगीण विकास; म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरणाची नियुक्ती
अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी म्हाडा (MHADA) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले असून, श्री स्वामी समर्थ मंदिराचा विकास काशी, उज्जैन आणि अयोध्या येथील धार्मिक कॉरिडॉरच्या धर्तीवर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
विकास आराखड्यातील प्रमुख बाबी
म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरणामार्फत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील कामांचा समावेश असेल –
श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास.
पहिल्या टप्प्यात मंदिर परिसर व समाधी मठ परिसराचे सुशोभीकरण व विकास.
दुसऱ्या टप्प्यात मंदिर ते समाधी मठ पालखी मार्गाचा विकास.
प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुरक्षितीकरण.
आधुनिक वाहनतळ, पदपथ आणि आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणा.
तलाव, उद्याने व सार्वजनिक सुविधांचा विकास.
भाविकांना होणार मोठा लाभ
या विकास प्रकल्पामुळे अक्कलकोटला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. वाहतूक कोंडी कमी होणे, स्वच्छ व आकर्षक परिसर, सुसज्ज पायाभूत सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणे, असे अनेक सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. त्यामुळे अक्कलकोटच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकासालाही मोठी गती मिळेल.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हा निर्णय अक्कलकोटच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगत, राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत
Back to top button
×
No WhatsApp Number Found!