
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..

अक्कलकोट : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मौजे निंबाळचे म नि प्र श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींचे पाद्यपूजन प्रथम व श्रृष्टी मसुती यानी केले. त्यानंतर पूज्य आप्पाजींच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नेहमीच्या चित्रपटातील गाण्यावरून डान्स व कर्कश आवाजाला फाटा देऊन संपूर्ण महाभारत कथेच्या माध्यमातून श्रीकृष्ण लीला दाखवून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित घडविण्याचे कार्य या शाळेतून होत असल्याबद्दल म नि प्र श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यानी समाधान व्यक्त केले.
या स्नेहसंमेलनात कृष्ण जन्मापासून ते कृष्णानी महाभारत युद्धामध्ये अर्जूनाला सांगितलेले उपदेश तथा गीता पर्यंत श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रावर आधारित अतिशय सुंदर अशा प्रकारे कृष्णावतार साकारला. त्यामुळे या शिक्षण संकुलात अध्यात्मिक,भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पूज्य आप्पाजींच्या पदस्पर्शाने हे शिक्षण संकुल पवित्र झाले असून, शाळेमध्ये अशा उपक्रमांची सध्या गरज असल्याचे मत आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या एका सुरात भगवदगीतेतील श्लोकांचे पठण केले, त्यानंतर देवकी विवाह आणि कारावास, कृष्ण जन्म आणि जन्माष्टमी सोहळा, कृष्ण बाललीला, कृष्ण नटखट लिला, गोपाळकाला, राधा-कृष्ण गीत, नागमर्दन (कालिया डान्स), मुकुंदा- मुकुंदा समुह गीत, गोवर्धन पर्वत, गोपिया गीत-कान्हा सो जा जरा, कंस वध, सुदामा भेट, महाभारत शीर्षक गीत, पांडव भेट, द्रौपदी-कृष्ण सखाबंधन, द्रौपदी चिरहरण, शांती प्रस्ताव, सेना चुनाव, कौरव पांडव युद्ध व शेवटी विष्णूच्या दशावताराने कार्यक्रमाची सांगता झाली. वरील सर्व प्रसंगाचे हुबेहूब चित्र,संभाषण व समूहगीताने विद्यार्थी व पालकानी मनसोक्त आनंद लुटला.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मुकुंद पत्की, भीमराव साठे, सिध्देश्वर कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसुती, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, रूपाली शहा, पुनम कोकळगी,सागर कल्याणशेट्टी, डाॅ विपुल शहा, सिध्देश्वर किणगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, अनंत चैतन्य प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, बापूजी निंबाळकर, दत्तकुमार साखरे, मलम्मा पसारे, सुवर्णा साखरे, कांतू धनशेट्टी, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली शहा, सूत्रसंचलन कल्पना स्वामी, दिगंबर जगताप, सागर मठदेवरू यानी केले तर उपस्थितांचे आभार आरती थोरात यानी मानले.
