पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई
पिंपरी, पुणे (दि. १२ मार्च २०२६) पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर समाज संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. पत्रकारांना वेगळी नजर असली पाहिजे आणि ते टिपून छापता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आयोजित “पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६” वितरण सोहळा गुरुवारी खराळवाडी, पिंपरी येथे पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा जणांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. देसाई बोलत होते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. राज्यस्तरीय दिवाळी अंकाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. प्रथम क्रमांक वल्ड सामना, दुसरा थिंक पॉझिटिव्ह, तिसरा गावगाथा आणि चौथ्या क्रमांक आनंद तरंग या दिवाळी अंकाला देण्यात आला. महापौर रवी लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, अध्यक्षा सायली कुलकर्णी, माजी महापौर योगेश बहल, उद्योजक कृष्णकुमार गोयल, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अधिकारी हरविंदर बन्सल, सुनील पवार, विजय भोजने, महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यावेळी उपस्थित होते.
प्रसिद्ध व्याख्यात्या शारदाताई मुंडे, अशोक बेलापूरकर, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, पाचंगे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. देसाई म्हणाले, ”आजघडीला पत्रकारिता नीचांकाला पोहोचली आहे. कोण आमदार मंगलअष्टिका म्हटला याच्या बातम्या केल्या जातात. एवढे फालतुकरण पत्रकारितेचे झाले आहे. एक प्रवक्ते सकाळी बोलतात आणि सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता त्याला उत्तर देतो. आपण कोणाबद्दल बोलतो, आपले वय, भान याचा विचार केला जात नाही. आजमितीला पत्रकारांना निर्भीडपणे लिहिता येत नाही. लिहिले तर छापले जात नाही. छापण्याचा आग्रह केला तर नोकरी जाण्याची भीती आहे. भारतातील मीडिया कॉर्पोरेट झाला आहे. उद्योजकांचे न्यूज चॅनेल असून त्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी बातम्या दिल्या जातात. अनेक चॅनेल सरकारची भलामण करतात. मीडियावर सरकारचे प्रभुत्व आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे मंत्रीपदांवरील व्यक्ती भाष्य करतात. दुर्देवाने मिडियातून त्याला प्रसिद्धी दिली जाते. आक्षेपार्ह गोष्टी दाखवू नये यावर आता जनतेने आवाज उठवला पाहिजे. जनतेशी निगडित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी धार्मिक मुद्दे समोर आणले जातात”.
चुका निदर्शनास आणून द्या – महापौर रवी लांडगे
”मी मस्तवणार नाही. आमच्याकडून चुका झाल्यास पत्रकारांनी आवश्य निदर्शनास आणून द्याव्यात. त्यात सुधारण केल्या जातील. तसेच चांगल्या कामाचेही कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पत्रकार सर्व क्षेत्रात चांगले काम करतात. पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही अराजकीय क्लब सुरू करावा. त्यातून गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्व गोष्टींवर साधक बाधक चर्चा होईल”, असे महापौर रवी लांडगे म्हणाले.
साहित्य, संस्कृती टिकली तर समाज टिकेल – कृष्णकुमार गोयल
”गुणवतांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे हे कौतुकास्पद आहे. सर्व पुरस्कारार्थी आपल्या क्षेत्रातील कर्तृत्वान आहेत. हा पुरस्कार शेवट नसून नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. पत्रकारिता हा स्तंभ चवळवळीतून निर्माण झाला आहे. शहरातील पत्रकारांनी अन्यायाला लेखणीतून वाचा फोडली आहे. चुकीच्या कामावर प्रहार आणि चांगल्या कामाचे कौतुक केले आहे. साहित्य आणि संस्कृती टिकली तरच समाज टिकेल. युवा महापौर असल्याने पिंपर चिंचवडचे भविष्य सुरक्षित हाती आहे. माझी जन्मभूमी पुणे असली तर कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे. शहराची औद्योगिकनगरी बरोबर आता सांस्कृतीक, क्रीडा, शैक्षणिक नगरी अशी नवीन ओळख होऊ लागली आहे असे उद्योजक कृष्णकुमार गोयल म्हणाले.
हेवा वाटावा असे पुरस्कारार्थी – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
“अनेक पुरस्कार मॅनेज केले जातात. पुरस्कारामुळे तिरस्कार निर्माण होईल असे पुरस्काराचे पेव काही दिवसांपूर्वी उठले होते. पत्रकार संघाने कोणालाही हेवा वाटावा असे पुरस्कारार्थी निवडले आहेत”, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले.
पत्रकारिता जगवायची की मारायची जनतेने विचार करावा – अविनाश चिलेकर
“पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटून चार वर्षे झाली, पण निकाल लागत नाही. न्यायपालिकेची ही अवस्था आहे. संसदीय लोकशाहीचीही वाईट परिस्थिती आहे. महापालिका प्रशासन अतिशय भ्रष्ट आहे. मागील चार वर्षांत महापालिका तिजोरी खाली केली आहे. पत्रकारांनी याचा जाब विचारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. पत्रकारिता जगवायची की मारायची याचा जनतेने विचार केला पाहिजे”, असे पुरस्कारार्थींच्या वतीने बोलताना ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर म्हणाले.
“पीसीएमसी टॉप १०” पुरस्कारार्थी
पत्रकारिता अविनाश चिलेकर, शासकीय अधिकारी मकरंद निकम, कामगार नेते शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, शैक्षणिक क्षेत्र प्रशांत पाटील, आर्किटेक्ट दीपक पाटील, वैद्यकीय क्षेत्र डॉ. राजेंद्र फिरके, सामाजिक क्षेत्र हणमंत माळी, रमेश वाघेरे, छायाचित्रकार नरेश नातू, क्रीडा क्षेत्र मनीषा राठोड यांना “पीसीएमसी टॉप १०” पुरस्काराने गौरविण्यात आले.
पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणीही उहापोह करीत नाही. त्यांच्या समस्येकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी प्रास्ताविकात केली. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डिजीटल मिडीया अध्यक्ष अमोल डंबाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबू कांबळे, उपाध्यक्ष विनय लोंढे, रेहान सय्यद, चिटणीस संतोष जराड, कोषाध्यक्ष गणेश शिंदे, प्रसिद्धीप्रमुख युनुस खतिब, सरचिटणीस मुकेश जाधव, कार्यकारिणी सदस्य प्रसाद बोरसे, जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, शबनम सय्यद, अमोल डंबाळे, विश्वास शिंदे यांनी परिश्रम घेतले.
———————————
Back to top button
×
No WhatsApp Number Found!