Pune : “आम्हाला रोज ५० रुपये भरणे परवडणारे नाही, निबंध लिहिण्याची शिक्षा दिलात तर आभारी असू ; महाराष्ट्र कामगार संघटनेकडून पुणे परिवहन कार्यालयाला निवेदन
पुणे (प्रतिनिधी) : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वच स्तरातून टिका केली जात आहे. शिवाय या निर्णयामुळे नागरिकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया आहे. कल्याणी नगर अपघातातील मुख्य आरोपीला न्यायालयाकडून ३०० शब्दात निबंध आणि १५ दिवस वाहतूक नियमन अशी शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात महाराष्ट्र कामगार सभा संघटनेकडून परिवहन विभागाला पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१ जूनपासून केंद्र शासनाने ज्या वाहनाची नूतनीकरण करण्यात आलेली नाही किंवा विलंब होईल अशा वाहनांसाठी प्रतिदिन ५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र वाहन चालक आर्थिक संकटात असल्या कारणाने सदर दंडामध्ये सूट मिळावी किंवा कालच्या हिट अँड रन प्रकरणातील न्यायालयाच्या निकालाआधारे “गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक, कॅब चालक , टेम्पो चालक यांचा धंदा मंदावल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे काहींनी वाहनांची नूतनीकरण करून घेऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रतिदिन ५० रुपये दंडा ऐवजी निबंध लिहिण्याची शिक्षा दिली तर बरं होईल” अशा शब्दांत महाराष्ट्र कामगार संघटनेचे सरचिटणीस मनोज वेताळ यांनी पुणेच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात पत्र दिलं आहे.
