सावित्रीबाई फुलेंनी स्त्री जातीला सन्मानाचा दर्जा दिला;ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त महेश इंगळेंचे प्रतिपादन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

सावित्रीबाई फुलेंनी स्त्री जातीला सन्मानाचा दर्जा दिला;ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त महेश इंगळेंचे प्रतिपादन

(प्रतिनिधी अक्कलकोट,
भारतासारख्या संस्कृती प्रधान देशात पूर्वी अनेक न्याय निवाडे होते. त्या पार्श्वभूमीवर स्त्री जातीला अनेक बंधने होती, त्यामुळे स्त्री जन्माची कहाणी अत्यंत दयनीय होती. याच काळात दिनांक ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्याच्या नायगाव गावात खंडोजी नेवासे पाटील व आई लक्ष्मी पाटील यांच्या उदरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या माळी समाजातील होत्या. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १२ वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते. तत्कालीन समाजाच्या कृप्रथांमुळे त्यांच्या काळात मुलगी वयात येण्याअगोदरच बालविवाह, विधवा महिलांवरील अत्याचार या रूढी परंपरांमुळे त्यांना नेहमी महिलांप्रती असलेली समाजाची मानसिकता पाहून त्यांचे मन हे हेलावत असे, आणि या मानसिकतेतूनच त्यांनी त्या काळात महिलांच्या ज्ञानज्योतीची मशाल पेटवली.
यानंतर त्यांचे पती ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हळूहळू त्यांनी १८ शाळा उघडल्या आणि इथूनच स्त्री जन्माचे भाग्य उजळण्यास सुरुवात झाले. येथूनच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री जातीला खऱ्या अर्थाने सन्मानाचा दर्जा दिला असे प्रतिपादन स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व श्री.वटवृक्ष महाराज देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले नुकतेच येतील स्विमिंग ग्रुप च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना इंगळे यांनी ज्यांच्यामुळे त्या काळापासून आजपर्यंत अनेक स्त्रिया शिक्षित झाल्या व होत आहेत. हे सर्व कार्य इतके सहज सोपे घडले नाही. असे म्हणतात की सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत. यामुळे त्यांचे धैर्य आणखीन बळकट होऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्या या कार्याने आज
बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले, समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या, म्हणून आज त्यांच्या जयंती प्रित्यर्थ येथे स्विमिंग ग्रुपच्या वतीने अभिवादन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत शेवटी एवढेच म्हणू इच्छितो की माई ग तत्कालीन व्यवस्थेन शेण फेकून मारलं, पण तू चंदन म्हणून स्विकारलस! बहिष्कार केला, पण तू कधी तिरस्कार केला नाहीस! धिंड काढली पण; तू कधी तूझा पिंड बदलू दिला नाहीस! प्रेतयात्रा काढली पण तू तूझी शिक्षणाची रथयात्रा कधी थांबवलीस नाही! दगड गोटे मारले पण तू नेहमीच त्याबदल्यात वैचारिक “फुले” दिलीस! म्हणून तू या देशाची खरी “सावित्री माय” झालीस. असेही प्रतिपादन महेश इंगळे यांनी शेवटी केले. याप्रसंगी संतोष पराणे, बाळासाहेब एकबोटे, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, सचिन किरनळ्ळी, महादेव अडवितोटे, राजू एकबोटे, शैलेश राठौर, ज्ञानू भोसले, प्रसन्न हत्ते, मल्लिनाथ प्याटी, अशोक कलशेट्टी, मल्लिनाथ माळी व समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होते

फोटो ओळ – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
