गावगाथा

बालसाहित्याचे दालन अधिक समृद्ध व्हावे : डॉ. राजा दीक्षित

बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन

बालसाहित्याचे दालन अधिक समृद्ध व्हावे : डॉ. राजा दीक्षित
– बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन
ता. 31 पुणे : उद्याचा सक्षम वाचक घडविण्यासाठी आजच बालसाहित्याचे दालन अधिक समृद्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी म्हणून बालसाहित्य विषयक कार्य करणार्‍या संस्था आणि चळवळी कार्यरत राहिल्या पाहिजेत. कारण संस्थाच भरीव कार्य करीत असतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था बालविश्‍वास ऐतिहासिक कामगिरी करेल, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य विश्‍वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, बालसाहित्यिक राजीव तांबे, राजीव बर्वे व चंद्रकांत शेवाळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. दीक्षित बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास वसेकर, सु. वा. जोशी, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, दीपक पागे, घनश्याम देशमुख, राजेंद्र कुलकर्णी, अशोक सातपुते, शिवाजी चाळक, श्रीकांत चौगुले, सचिन बेंडभर, निर्मला सारडा आदी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, बालसाहित्य चळवळ महानगरापूती तसेच शहरी बालकांपर्यंत मर्यादित न राहता ती ग्रामीण आदिवासी मुलांपर्यंत पोहचली पाहिजे. ग्रामीण भागात बालसाहित्याची खरी गरज आहे. बालसाहित्य परीकथेपुरते मर्यादित न राहता नवतंत्रज्ञान आणि नवविज्ञानापर्यंतच्या गोष्टी बालसाहित्यात अवतरल्या पाहिजेत. लवकरच संस्थेचा सुवर्णमहोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे वर्षभर संस्थेच्या मार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बालसाहित्य विश्‍वाला सोनेरी रूप येवो.  
राजीव तांबे म्हणाले, बाल साहित्यात लिहिती नवी पिढी तयार झाली पाहिजे. तरच बाल साहित्याचा प्रवाह सुरू राहिल. बालसाहित्याबाबत घर, शाळा तसेच प्रशासकीय पातळीवर उदासीनता आहे. ही उदासीनता दूर करण्यासाठी पुस्तकांविषयी बोलले पाहिजे. बालक, पालक, शिक्षकांना सोबत घेवून चळवळ पुढे नेली पाहिजे. माधव राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. अनिल कुलकर्णी यांनी संस्थेची व संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. सु. वा. जोशी, प्रा. विश्‍वास वसेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट
पुनरूजीवन ही वाड्:मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरूजीवन ही वाड्:मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्यांच्या खांद्यावर भवितव्य आहे. त्या बालकांसह कुमारांना सशक्त करणे काळाची गरज आहे. पालकांनी मुलांच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे लादले आहे. शाळा, शिकवणी, गृहपाठ आदीमुळे मुलांचे खेळ आणि अवांतर वाचन इतिहासजमा होत आहे. अशा कठीण परिस्थितीत मुलांचे बालपण आनंददायी ठेवण्यासाठी बाल साहित्य संस्थांना बालसाहित्याचे व्यासपीठ अग्निकुंडासारखे धगधगते ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सोसायटीत ग्रंथालय आणि बाल दालन असले पाहिजे. या मागणीसाठी साहित्य संस्थांना चवळव उभी करावी लागणार आहे. चांगले बालसाहित्य प्रकाशित होत आहे. ते मुलांपर्यंत पोहचले पाहिजे. अशी अपेक्षा प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button