गावगाथा

वाचनाअभावी मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता तर शिक्षकांमध्ये गतीमंदता : गिरीश प्रभुणे

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन

वाचनाअभावी मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता तर शिक्षकांमध्ये गतीमंदता : गिरीश प्रभुणे

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ
बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन

पुणे : पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे मुलांना पुस्तके वाचनाची आवड आणि गोष्टी ऐकण्याची सवय राहिलेली नाही. अशा मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता वाढीस लागल्याचे जाणवत आहे. शालेय मुलांना कविता वाचून, गाऊन दाखविल्या जात नसल्यामुळे शिक्षकही गतीमंद झाले आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. लहान मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागण्याच्या दृष्टीने, मुलांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ आणि बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचा प्रकाशन समारंभ आज (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गिरीश प्रभुणे अध्यक्षपदावरून बोलत होते. स्मरणिकेचे प्रकाशन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तर लेखकांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड मंचावर होते. बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यात सहभागी असलेले रामकृष्ण बेटावदकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास महाराष्ट्रातील संस्थेचे पदाधिकारी तसेच बालसाहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुले वाचत नाहीत असे म्हणणे खोटे आहे. मुलांना वाचायला दिल्यास ती आवडीने वाचतात याविषयीची उदाहरणे सांगून गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले, मुलांचे वाचन वाढल्यास त्यांची कल्पनाशक्तीही वाढीस लागेल. उद्याच्या भारतापुढील समस्या जाणून घेण्यासाठी मुले आभासी, स्वप्नवत जगात राहून चालणार नाही. ग्रामीण, समाजातील मागास घटकांचे भावविश्व समजण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
मुलांमध्ये अकाली प्रौढत्व येऊ नये : प्रा. मिलिंद जोशी..
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सध्या बालकुमारांसाठीचे उत्तम साहित्य देखण्या रुपात प्रसिद्ध होत आहे; पण या बालकुमारांना वाचनासाठी कसे प्रवृत्त करायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोना काळात लागलेले मोबाईलच्या वापराचे व्यसन उग्र रूप धारण करताना दिसत आहे. मुलांच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाचन आणि खेळ या महत्वाच्या गोष्टींना स्थान राहिलेले नाही. पालक आणि शिक्षक पुस्तक वाचताना दिसले तरच मुले पुस्तके वाचणार आहेत. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी अशी अपेक्षा पालक बागळून आहेत. त्यांच्या अपेक्षेत गैर काहीच नाही पण ती ठेवताना मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे. अस्वस्थ वर्तमानाचे पडसाद मुलांच्या भावविश्वावर पडून त्यांचे बालपण कोमेजून जाऊ नये आणि परिकथेत रमण्याच्या वयात त्यांना अकाली प्रौढत्व येऊ नये याची खबरदारी पालक आणि शिक्षक यांनी घ्यायला हवी.
सध्याची पिढी व्हर्च्युअल रिॲलिटीत : डॉ. सदानंद मोरे..
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पूर्वीची पिढी साहस, अद्भुत, रम्य अशा रंगांत रंगलेली होती; पण सध्याची पिढी व्हर्च्युअल रिॲलिटीत रमलेली दिसून येत आहे. हे पालकांसमोरील मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सध्या बरीच चर्चा आहे, पण या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून वास्तवतेची जाणीव कशी करून देता येईल या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. मुले वाचनाच्या दृष्टीने संस्कारीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बालकुमार सुवर्णगाथा ही स्मरणिका मराठी साहित्य संस्कृतीतील प्रतिक ठरेल अशा शब्दात डॉ. मोरे यांनी स्मरणिकेचा गौरव केला.
बालकुमार सुवर्णगाथा या स्मरणिकेविषयी संपादक अनिल कुलकर्णी यांनी तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांच्या सत्काराविषयी माधव राजगुरू यांनी माहिती दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने भारत सासणे आणि ल. म. कडू यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळांना या प्रसंगी पुस्तक संच भेट देण्यात आला. या उपक्रमाची माहिती विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात विमलाबाई गरवारे शाळेतील विद्यार्थिनींनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रसाद भडसावळे यांनी मानले.

फोटो ओळ : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसमवेत संजय ऐलवाड, माधव राजगुरू, प्रा. मिलिंद जोशी, गिरीश प्रभुणे, अनिल कुलकर्णी, प्रसाद भडसावळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button