पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण चळवळ गतिमान करावी – मल्लिनाथ कल्याणशेट्टी

अक्कलकोट: कल्याणशेट्टी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. वृक्ष लागवड चळवळ थंडावली आहे. ती गतिमान करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

हनूर रोडवरील महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या पूनम कोकळगी, प्राचार्य डॉ राजेंद्र सिंह लोखंडे, कार्यक्रमाधिकारी प्रा राज शेखर पवार उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना मानव हिताची असून त्यामुळे शुद्ध हवा तसेच पावसाचे प्रमाण वाढणार आहे म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच पर्यावरणाचे संतुलन आबाधित राहील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, आभार प्रा राजशेखर यांनी मानले.

.. वृक्ष संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत..
सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण केले जाते परंतु त्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील सामाजिक संस्थांनी घेतली पाहिजे. वृक्षाचे संवर्धन देखील केले पाहिजे असे यावेळी मार्गदर्शन करताना पूनम कोकळगी यांनी सांगितले.
वृक्षारोपण उपक्रमाची कौतुक

राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंच उंबर पिंपळ करंजी वृक्षाचे रोपण केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसुती, रूपाली शहा, मलकप्पा भरमशेट्टी यांनी कौतुक केले. झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी दिला..