Akkalkot : अनंत चैतन्य प्रशालेचा “विठ्ठल दिंडी सोहळा” भक्तीमय वातावरणात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व धार्मिक वैशिष्ट्य मानले जाणारे “विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म”, “भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा हरिहरा भेद नाही ” अशा स्वरूपाचे सर्वधर्मसमभावाचे शिकवण देणारे वारकरी संप्रदाय विठुमाऊलीच्या दर्शनाच्या ओढीने आसुसलेला,ऊन,वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता,घरदार सोडून,वय विसरून बेभान होऊन पंढरपुर च्या दिशेने निघालेला, नित्यनेमाने वारी करणारा वारकरी ” व त्याची भक्ती याची अनुभूती व्हावी याकरिता -महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे आज ” वारी पर्यावरण रक्षणाची व विठुमाऊलीचा दिंडी सोहळा कार्यक्रम ” अतिशय उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. प्रारंभी प्राचार्य अशोक साखरे यांच्या हस्ते ” विठ्ठल- रुक्मिणी माता, ज्ञानेश्वरी व तुकारामगाथेची पुजा करून आरती करण्यात आली.

यानंतर शाळेपासून ते हन्नूर गावातून दिंडी निघाली तेंव्हा गावातील अनेक माताभगिनीनी “विठ्ठल- रुक्मिणी” पालखीचे पाणी घालून, नारळ फोडून जंगी स्वागत केले .टाळ, मृदुंग, वीणा , कपाळास टीळा,गळ्यात तुळशीमाळ घालून,वैष्णव पताका खांद्यावर घेऊन ,मुखाने हरिनामाचा जयघोष करत,झिम्मा ,फुगडी, कोलांट उडी,रिंगण ,भजन करत निघालेली पांढऱ्या वेशभूषेतील मुले व साडी नेसलेल्या मुलींमुळे जणू वारीचेच स्वरूप आले होते.

मुलां- मुलींनी या दिंडी सोबतच गावकऱ्यांना “वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा “ही संदेश दिला. अप्रतिम अशा या दिंडी सोहळा व पर्यावरण रक्षणाच्या वारीचे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य सिध्देश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,हन्नूर गावचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, संस्थेच्या सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले. ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे समस्त शिक्षक बंधू- भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
