महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न; सुप्रिया सुळेंसह हे खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी
या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे.

महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न; सुप्रिया सुळेंसह हे खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी
या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे.

देशातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आलाआहे.यंदा संसदरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. संसदेत प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक कामात योगदान आणि समित्यांमधील कार्य या विविध निकषांवर आधारित विशेष मूल्यांकनानंतर ही निवड केली जाते. या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे.

महाराष्ट्रातील कोणाची नावं?
महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट), अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट), नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट), स्मिता वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप) आणि वर्षा गायकवाड (कॉंग्रेस) या 7 खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे. यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देण्यात येणार आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशन’ने दिलेल्या निवेदनानुसार, भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे चार खासदार 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरले असून सध्याच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेने कार्यरत आहेत.

इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये स्मिता वाघ (भारतीय जनता पक्ष), अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), नरेश गणपत म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (कॉंग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), रवि किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरण महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.विभागीय संदर्भ असलेल्या वित्त आणि कृषी या दोन संसदीय स्थायी समित्यांनाही संसदेमध्ये सादर केलेल्या अहवालांच्या आधारे पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. वित्त समितीचे अध्यक्ष भर्तृहरि महताब, तर कृषी समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी आहेत.

