Pune : रिक्षाचालकांना उर्मट समजणाऱ्यांनी जरा इकडे लक्ष द्या..! साडेआठ तोळे सोने असलेली बॅग….. अन् पोलिसांनी केला सन्मान….


पुणे (प्रतिनिधी): शहरात रिक्षाचालक म्हंटलं की, उद्धट, आगाऊ आणि उर्मट असतात, अशी भाषा सर्वत्र पहायला मिळते. मात्र असेही काही रिक्षाचालक आहेत, जे अत्यंत प्रामाणिक आणि स्वाभिमानी असतात. मंगळवारी (दि.१०) पुण्यात घडलेल्या एका प्रसंगाने रिक्षाचालकांनी आपल्या प्रामाणिकपणाची प्रचिती आणून दिली आहे. एका महिलेचे साडेआठ तोळे सोने असलेली बॅग रिक्षाचालकांनी परत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश चंद्रकांत रासकर असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांना पानमळा ते स्वारगेट येथे प्रवासी घेऊन जात असताना एका महिलेची साडेआठ तोळे सोने असलेली बॅग रिक्षामध्ये मंगळवारी (ता. १०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विसरली, त्यानंतर रिक्षा सदाशिव पेठेत गेल्यानंतर रिक्षाचालकांच्या ते लक्षात आले.


त्यानंतर रासकर यांनी ती बॅग घेत थेट स्वारगेट पोलिस चौकी गाठली. मात्र, तोपर्यंत स्वारगेट पोलिस ठाण्यात ग्राहकाने बॅग हरवल्याची तक्रार नोंंद केली होती. त्यानंतर महिलेला बोलावून घेण्यात आले.
बॅग चौकीत घेऊन गेल्यानंतर त्यामध्ये साडेआठ तोळे सोने असल्याचे पोलिसांनी रासकर यांना सांगितले. प्रवाशी महिलेला बोलावून पोलिसांनी ती बॅग तपासली. त्यानंतर सर्व ऐवज जशास तसा होता. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने ती बॅग आणि त्यातील सर्व ऐवज हा प्रवाशी महिलेच्या ताब्यात देण्यात आला.
सदर रिक्षाचालकाच्या कामाचे कौतुक म्हणून स्वारगेट पोलिसांकडून रासकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वारगेट (नेहरु स्टेडियम) पोलीस चाैकीचे पोलीस उपनिरिक्षक बाळू पोपट सिरसट, पोलिस अंमलदार अमोल काटे, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.
कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही, अशी आमची शिकवण आहे. त्यानुसार त्या बॅगेत काय ऐवज आहे हे मला माहितीही नव्हते. बॅग रिक्षात राहिल्यावर ती परत करण्याच्या उद्देशाने मी स्वारगेट पोलिस चौकीत जाऊन जमा केली.
मात्र, तिथे गेल्यानंतर कळले की त्यामधे साडेआठ तोळे सोनं होते. पोलिसांनीही माझा सन्मान करुन एक आदर्श घातला आहे. त्यामुळे चांगल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद आहे.
– राजेश चंद्रकांत रासकर,