Pune : खुला रिक्षा परवाना लवकरच बंद होणार ; जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती

पुणे (प्रतिनिधी): खुला रिक्षा परवाना बंद करण्याविषयी पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतलेला आहे. खुला परवान्याचे मूळ धोरण राज्य शासनाचे असल्याने येथील निर्णयाला शासन मान्यता घ्यावी लागेल.

परिवहन आयुक्तांकडे पाठपुरावा करून हा निर्णय अमलात आणला जाईल. तसेच, रिक्षा संख्या दुपटीहून जास्त झालेली असताना नवीन रिक्षा थांबे दिले गेले नाहीत. मधल्या काळात निवडणुका आदी सर्वोच्च प्राधान्यक्रमाची कामे प्रशासनाला करावी लागली. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या महिना अखेर पर्यंत नवीन रिक्षा थांबे दिले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिली.

रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार आणि विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षा चालकांचे विविध प्रश्न मांडताना पवार म्हणाले, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ताबडतोब खुला रिक्षा परवाना बंद करावा. तसेच, नवीन रिक्षा बॅजही देणे बंद करावे. २०१० नंतर गेल्या १५ वर्षात एकही नवीन स्टँडला मंजुरी मिळालेली नाही. रिक्षा स्टँडसंदर्भात अद्याप सर्वेक्षण झालेच नाही. सीएनजीच्या दरात वाढ झाली असून रिक्षा भाडेवाढ अपरिहार्य आहे. भाडेवाढ टाळण्यासाठी सीएनजी दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुण्यात सीएनजी मुंबई पेक्षा प्रतिकिलो आठ रुपयांनी महाग आहे. यामागे कसलेही तर्कसंगत कारण नाही. बाईक टॅक्सिला पुण्यात परवानगी देऊ नये.

यावेळी इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रश्न मांडताना, सीएनजी टाकीच्या हायड्रो टेस्टसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे, मीटर पासिंग केले असताना पुनर्रपासिंग साठी आकारला जाणारा दंड रद्द करावा, ओला उबेरची बेकायदा वाहतुकीवर कारवाई करावी आदी विषय मांडले. यात बापू भावे, आनंद अंकुश, संजय कवडे, आबा बाबर, सिद्धार्थ चव्हाण, सोपान घोगरे, तुषार पवार, बापू धुमाळ, शफिक पटेल, सुरेश जगताप, हेमंत धनगर, विलास केमसे, विजय रवळे यांचा समावेश होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषय बारकाईने समजून घेतले. तसेच, मुक्त परवाना बंद, रिक्षा थांबे वाढवणे याबाबत ठाम भूमिका घेत हे निर्णय करायचेच असल्याची स्पष्टोक्ती केली. त्याविषयी कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, मीटर पासिंग विषयीचा दंड रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, रिक्षा योग्यता प्रमाणपत्र तपासणीच्या वेळेला मीटरमध्ये फेरफार झाल्याचे आढळल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला.