
अक्कलकोट, दि.१५-
श्री ची पालखी….वाद्यवृंदांचा गजर…वारकरी पथक…पारंपरिक वेशभूषेतील बंधू-भगिनी आणि ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जयघोषात स्वामींची पालखी सोहळा उत्साहात झाला.

सालाबादप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठ ( श्री चोळप्पा महाराज वाडा) येथून चोळप्पा महाराज यांचे वंशज पुजारी परिवार यांच्याहस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. दोन हजारावर भाविकांचा सहभाग होता. पालखीला विविध प्रकारच्या पुष्पमाला सह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी मुंबई, कल्याण, ठाणे व कोकणातील पारंपरिक वेशभूषेतील हजारो बंधू-भगिनी भगव्या उंच झेंडा पकडून टोप्या, वस्त्र परिधान करुन सहभागी झाले होते. यातील महिलांनी मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. यातूनच भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आणि
यामुळे अक्कलकोट शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

अक्कलकोट, जेजुरी येथील पांरपरिक वाद्यांचे पथक, तुतारी, सनई मधील तोटा पथक, वारकरी मंडळाचे पथक, भजनी मंडळाचे टाळ मृदुंग, वीणा अग्रभागी होते. श्रींच्या पालखीपुढे मंत्रोपचार करणारे पुरोहीत पायी सहभागी झाले होते. पालखी मिरवणूक बुधवार पेठ कॉर्नर, ऐतिहासिक कारंजा चौक, मेन रोड, फत्तेसिंह चौक मार्गे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, जोशी बुवा मठ मार्गे श्री स्वामी समर्थ समाधी मठात पोहोचली. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
रात्री उशिरापर्यंत पालखी सोहळा सुरू होते. संपूर्ण पौरोहीत्य पुजारी परिवार यांच्यामार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या मिरवणुकीत अण्णू महाराज, धनंजय महाराज, अनुप महाराज, महेश महाराज, सुधाकर महाराज, आदित्य महाराज, नितीन महाराज, संदेश महाराज, निलेश महाराज, चिन्मय महाराज, निखिल महाराज, प्रसाद महाराज, केदार महाराज, पवन कुलकर्णी, पुणेचे नरेश अहिर, बुधवार पेठ समाधी मठ तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते, समाधी मठ भजन मंडळाचे कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
