Breaking: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता घरकुल बांधणाऱ्यांसाठी मिळणार पाच ब्रास मोफत वाळू, पण….
पुणे (प्रतिनिधी): आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी केली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.


एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल.


कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य
कृत्रिम वाळूचा वापर वाढावा, याकरिता यावर्षी (2025-26) शासकीय विभागांच्या बांधकामात किमान 20 टक्के कृत्रिम वाळूचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून मात्र शासकीय बांधकामात पूर्ण कृत्रिम वाळू वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरवर्षी वाळू उपशाबाबतचे वेळापत्रकही या धोरणात निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वाळू गटाचे प्रस्ताव सादर करण्यापासून, सर्वेक्षण, तालुका समितीची बैठक, जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक, पर्यावरण सल्लागाराला प्रस्ताव पाठवणे, खाणकाम आराखडा, तांत्रिक अहवाल करणे गरजेचं आहे.