शिका,संघटित व्हा, संघर्ष करा!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील समाजाची अवस्था पुढील शब्दात सांगता येईल – ‘ निरक्षरतेने जनतेला मानसिक दृष्ट्या गुलाम, नैतिक दृष्ट्या अध : पतित, सांस्कृतिक दृष्ट्या पंगुवत, आर्थिक दृष्ट्या दरिद्री आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले केलेले होते. त्याच्या सामाजिक दर्जामुळे त्यांचे जगणे दुःखमय करण्यात आले होते; आणि ते कोणत्याही प्रतिष्ठेला आणि सन्मानाला मुकलेले होते. अशा काळात डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजाचा समग्र अभ्यास केला ; आणि ‘ सामाजिक परिवर्तनाचे हत्यार म्हणून शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे’ , या मतावर ते ठाम झाले. सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण हा एक राजमार्ग आहे,याची त्यांना जाणीव झाली. ‘ सभ्यता ‘ आणि ‘ संस्कृती ‘ याचा शिक्षण हाच पाया आहे, असे त्यांनी जाहीर केले.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या १९२५ साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या संस्थेची स्थापना केली . दलित वर्गाच्या हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी सोलापूर येथे वस्तीगृह या सभेच्या मार्फत सुरू करण्यात आले.या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागणारी कपडे, लेखन सामग्री,भोजन यांचा खर्च दिला जात असे.
‘ शिक्षक हे राष्ट्राचे रथचालक आहेत आणि सामाजिक सुधारणांच्या दृष्टिकोनात या अध्ययन व्यवसायांमध्ये योग्य माणसाची निवड झाली पाहिजे ‘,या मताचे डॉ. आंबेडकर होते. शिक्षणाचे नियंत्रण नि: संशयपणे सुशिक्षित वर्गाने केले पाहिजे, असे त्यांना वाटायचे.परंतु त्या काळामध्ये सामाजिक सद्गुण या वर्गामध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी १९२८ मध्ये त्यांनी दलित वर्ग शिक्षण संस्था ( depressed class Education Society) स्थापन केली. त्यांना विद्यापीठाचा मूलभूत हेतू हा जनतेच्या दारातील पायऱ्यांपर्यंत शिक्षण घेऊन जाणे हा आहे असे वाटायचे. म्हणून,’ विद्यापीठाचे मूल्यांकन केवळ त्यांच्या ज्ञानसंपदनाने न होता त्यांच्या सामाजिक वागणुकीने झाले पाहिजे.’ असे ते म्हणायचे.
८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. मुंबई येथे २० जून १९४६ रोजी सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय या संस्थेमार्फत सुरू झाले. पी.ए. सो. चे ध्येय व उद्दिष्ट जाहीर करताना डॉ. आंबेडकर म्हणाले की,” पी.ए.सो. चा हेतू केवळ शिक्षण देण्याचा नाही, परंतु शिक्षण अशा रीतीने द्यायचे की त्यामुळे भारतामध्ये बौद्धिक सामाजिक आणि नैतिक लोकशाहीचे प्रचालन करता येईल.” पुढे १९५० मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कला आणि विज्ञान महाविद्यालय त्यांनी सुरू केले.
गौतम बुद्ध,’ ज्ञान म्हणजेच प्रकाश असे म्हणतो.’ ज्याप्रमाणे प्रकाश अंधकाराला भेदून नवचैतन्य, ऊर्जा देतो, त्याप्रमाणे शिक्षण व्यक्तीच्या मनमंदिरातील अंधकार दूर करून त्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी देते. अस्पृश्यता आणि जातीभेद म्हणजे भारतीय समाजाला झालेला कॅन्सर होता. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ या रोगाचा उपचार ठरल्या. आणि या उपचारासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी ‘ औषध ‘ म्हणून वापरले गेले. म्हणूनच डॉ. आंबेडकर यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन विधायक आणि रचनात्मक होता.शिक्षण हा सामाजिक, आर्थिक,राजकीय क्रांतीचा मुलाधार आहे असे, त्यांचे सांगणे होते.
‘ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘, या तीन तत्त्वात डॉ. आंबेडकरांच्या सर्व शैक्षणिक विचाराचे सार आहे.क्रियाशील बनणं, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणं आणि त्यासाठी संघटन बांधणं म्हणजे क्रांतीचा मार्ग खुला करणं होय. अमेरिकेहून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, ” दिनदलितांचे दैन्य संपविण्यात एकमेव मार्ग म्हणजे त्यांचं शिक्षण होय. कार्यकर्त्यांनी शिक्षण प्रसारासाठी झटलं पाहिजे. ” त्याच पत्रात त्यांनी शेक्सपियरच्या नाटकातील एक वचन उद्घृत केले होते, ” प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते, तेव्हा तिचा योग्य प्रकारे उपयोग केला तर त्या मनुष्यात वैभव प्राप्त होते. ” आज हा डॉ. आंबेडकरांचा संदेश सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जणांनी देखील ध्यानात घेतला पाहिजे. शिक्षण ही संधी आहे आणि त्या संधीचे सोनं करण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. ही संधी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी , शिक्षकांनी आणि शिक्षण व्यवस्थेने निरपेक्ष भावनेने प्रत्येकाच्या दारापर्यंत घेऊन गेली पाहिजे.
“शिक्षण हाच राष्ट्रीय उन्नतीचा मूलमंत्र आहे. सामाजिक क्रांती घडवून आणायची असेल तर त्याची बीजे बालवयातच पेरली पाहिजेत.” ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराची कास शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाने धरली पाहिजे. “व्यक्तीला ‘ जाणीव ‘ देते ते शिक्षण होय.”अशी डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या केली आहे.आज भान हरपलेली पिढी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपण काय करतो? त्याचे परिणाम काय होतील? याचा सारासार विचार करण्याचे शिक्षण मुलांना दिले जात नाही. सोशल मीडियाच्या आजच्या काळात लोक स्वतःवरील नियंत्रण हरवल्याप्रमाणे व्यक्त होतात. या काळात लोकांच्या जाणवेच्या कक्षा अरुंद करण्याचे काम काही कावेबाज लोक करत आहेत. अशा काळात दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्याची सामाजिकता बाळगण्याचे शिक्षण दिले पाहिजे.डॉ. आंबेडकर म्हणत,”उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.” आज शिकलेला तरुण देखील निर्बुद्ध पणे व्यक्त होताना आणि कृती करताना दिसत आहे. अशा काळात डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या नैतिक आणि सामाजिक शिक्षणाची गरज भासत आहे. लेखक,विचारवंत आणि शिक्षणातून शहाणपण आलेल्या लोकांना डॉ.आंबेडकरांनी दिलेला पुढील संदेश कृतीत आणण्याची आज आवश्यकता आहे. ते म्हणत , “आपली लेखनी आपल्या प्रश्नापूरती बंदिस्त करू नका,तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंध:कार दूर होईल असं परिवर्तित करा.” आपली लेखणी पाजळवण्याचे आणि वक्तृत्वाने समाज जागृत करण्याचे काम खऱ्या शिक्षण प्रेमींनी केले पाहिजे.
“जी व्यक्ती आपल्या पत्नी आणि अपत्यापेक्षाही शिक्षणावर अधिक प्रेम करते त्या व्यक्तीला शिक्षणप्रेमी म्हणावे “, असे डॉ. आंबेडकर कटू आणि कठोर शब्दात शिक्षणाचे महत्त्व प्रकट करतात. आजच्या शिक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झाल्याचे आपल्या लक्षात येते. कोचिंग क्लास आणि डोनेशन आधारित शिक्षण याकडे बहुजन वर्ग आकर्षित होत आहे. शिक्षणाचा उद्देश नोकरी मिळवणे, पुढे अर्थाजन करून स्वतःची भौतिक प्रगती साधने, या पुरता मर्यादित झाला आहे. आज शिक्षक, पालक आणि शिक्षण व्यवस्था ही शिक्षणावर बेगडी प्रेम करणारी ठरत आहे. शिक्षण संस्था या ‘ सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या’ प्रमाणे पोसल्या जात आहेत. अशा काळात डॉ. आंबेडकरांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन प्रचलित करण्याचे फार मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते,” या देशात लोकशाही यशस्वी करायची असेल तर जनता / समाज नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे संस्कारित असावा. ” अर्थात त्यासाठी
, ” शिक्षणाचा उद्देश हा लोकांना नीतिमान आणि सामाजिक वळण लावणे हा असावा.” हा डॉ. आंबेडकरांचा शिक्षणाबाबतचा उद्देश बाळगण्याची आवश्यकता आहे.आज शिक्षणातून या दोन गोष्टी कितपत साध्य होतात याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. नैतिकता जोपासण्याचे विचार शिक्षणातून दिले जातात का? दिलेले विचार विद्यार्थी कितपत आत्मसात करतात; आणि आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरवतात यावर या प्रक्रियेचे यशपायश अवलंबून आहे.
थोडक्यात डॉ. आंबेडकर यांना जीवनवादी, शास्त्रीय,मानवतावादी, समाजहितकारी , शील आणि प्रज्ञा यांचा सुवर्णसंगम साधणारे शिक्षण अभिप्रेत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
– किशोर जाधव, सोलापूर
– मो. नं. ९९२२८८२५४१
Back to top button
×
No WhatsApp Number Found!