मालवणमधील राजकोट किल्ल्याची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्याकडून पाहणी…
भेट पाहणी

मालवणमधील राजकोट किल्ल्याची श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्याकडून पाहणी…

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली.



यावेळी त्यांनी प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांची यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रारंभी अनिल सुतार यांनी जन्मेजयराजे भोसले महाराज व त्यांच्या टीमचे स्वागत केले. यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीनेही सुतार यांचा सन्मान करण्यात आला. या मूर्तीचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या नेतृत्वाखाली राम सुतार आर्ट क्रियेशनने हाती घेतले आहे.

या भव्य दिव्य सुरू असलेल्या कामाबद्दल भोसले महाराज यांनी समाधान व्यक्त करत सुतार यांच्या कला कौशल्याचे मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि अक्कलकोट भेटीचे निमंत्रण
देत शुभेच्छा दिल्या. दरम्यान या बहुचर्चित पुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्याची तयारी आता सुरू झाली आहे.

या पुतळ्याचे काम चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे,असे मूर्तिकार सुतार यांनी सांगितले.अक्कलकोट येथील श्री स्वामी
समर्थ अन्नछत्र मंडळाबद्दल देखील मला माहिती आहे. या संस्थेचे कार्य सुध्दा उल्लेखनीय आहे. अन्नदानाचे कार्य
अखंडपणे संस्थेतर्फे सुरू असते.दिल्लीत आपल्या संस्थेचे नाव आहे.
या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी
महाराजांचे धातूशिल्प आणि गड किल्ले
शिल्प पाहण्यासारखे आहे लवकरच या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत,असे
सांगून संस्थेच्या प्रगती बद्दल आस्थेने विचारपूस केली.
या पुतळयाच्या निर्मितीसाठी नितीन जाधव,भुलेश्वर विश्वकर्मा,तेजस हांडे प्रयत्नशील आहेत.यावेळी अन्नछत्र मंडळाचे पालखी संयोजक संतोष भोसले, प्रशांत साठे, संतोष माने, महांतेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
चौकट :-
पुतळ्याचे काम सुरेख :
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमीच्या भावना संतप्त होत्या.पण तितक्याच तत्परतेने सरकारने हे काम हाती घेतले आणि आज पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले ही बाब खरोखर समाधानाची आहे. पुतळ्याचे काम अतिशय सुरेख झाले आहे.
जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले,
संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट