गावगाथा

I कृपादृष्टीने पाही समर्था Iश्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्ती, सेवा, व उपक्रम……

श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेख

I कृपादृष्टीने पाही समर्था Iश्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्ती, सेवा, व उपक्रम……

(शब्दांकन – श्रीशैल गवंडी, अक्कलकोट)

प्रज्ञापुरी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा श्री गुरु दत्तात्रयांचा पूर्ण अवतार आहे. श्री गुरु दत्तात्रयांच्या परंपरेतील श्री स्वामी समर्थांचा चौथा अवतार आहे. मूळपुरुष श्री गुरुदत्तात्रय, दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ पीठापूर, तिसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर आणि चौथे अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज. मग पुढे या परंपरेत अनेक अवतार जनकल्याणार्थ झाले. धर्माच्या, साधूसंत सज्जनांच्या रक्षणार्थ दृष्टांच्या निर्दलनासाठी त्यास पुन्हा पुन्हा यावेच लागणार आहे. ज्या ज्या वेळी धर्म पालनापासून लोक दूर जातात, धर्माला मलीनता येईल त्या त्या वेळी धर्माच्या उत्थापनेस देवाला यावेच लागेल.
आंध्र प्रदेशात पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी सर्व पृथ्वीवर भ्रमण केले. धर्म वाढविला ही गोष्ट चौदाव्या शतकातील आहे. कुरवपूर येथे त्यांच्या पादुका आहेत तेच पुढे इसवी सन १४०८ ते १४५८ या काळात कारंजा लाड येथील नृसिंह सरस्वती या नावाने जन्मास आले. गाणगापूर येथे भारत ब्रह्मण करून आल्यावर अवतार समाप्तीची कृती केली. आणि कर्दळी वनात निघून गेले. त्यांच्या तपाची ठिकाणे महाराष्ट्रात नरसोबाची वाडी, औदुंबर येथे आहेत. पुढे जवळ जवळ ३०० वर्षांनी कर्दळी वनात म्हणजे श्रीशैल्य पर्वतातून प्रकट झालेले श्री स्वामी समर्थ महाराज होय. संपूर्ण हिमालय फिरून सन १८३८ मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या नजीक असलेल्या देवरनिम्बर्गी या गावी व त्यानंतर मंगळवेढा येथे प्रकटले. तेच स्वामी समर्थ पुढे मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर येथे बराच काळ वास्तव्यास होते. इसवी सन १८५७ सालातील मिती अश्विन शु.५ म्हणजेच ललित पंचमीच्या शुभ मुहूर्तावर ते अक्कलकोट येथे आले. जवळजवळ २२ वर्षे येथील वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराजांनी वास्तव्य केले. इसवी सन १८७८ मध्ये चैत्र वैद्य त्रयोदशी वार मंगळवार रोजी महाराज येथेच समाधीस्थ झाले. आज या गोष्टीला १४७ वर्ष पूर्ण झाली. श्री.स्वामी समर्थांच्या अवतार समाप्तीनंतर एक शतकाहून अधिक काळ लोटला पण आजही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव येथे भाविकांना होत असते. येथे येऊन स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर भाविकांच्या जीवनाला नवी उभारी येते. भौतिक दृष्ट्या सुखी असणारे मानवी जीवन आध्यात्मिक दृष्ट्या शून्य आहे. प्रत्येकाची ओढ श्री स्वामी समर्थांच्या चरणाकडे आहे. आपल्या व्यथा, वेदना, चिंता, दुःख समर्थांच्या चरणी अर्पण करण्यासाठी व सुखाचा समाधानाचा ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी स्वामींच्या सेवेतच जीवन वाहिलेले अनेक भक्त आहेत.

कृपा करा दासावरी स्वामीराया
दूर लोटू नका जवळ करा काया
देह ओवाळूनी टाकीतो तुझ्या पाया
तूच माऊली होऊनी करी माया

श्री स्वामी समर्थ महाराजांनी अभिवचन दिले आहे ‘हम गया नही जिंदा है’ या अभिवचना प्रमाणे समर्थ माऊलींचे अस्तित्व हे चिरंतन आहे. भक्तांच्या भक्तीतून म्हणजे नामस्मरण नामसेवेतून भक्तांना कृपादृष्टी प्राप्त होते. कृपादृष्टी प्राप्त होण्याकरिता समर्थांकडे काहीतरी मागण्यापेक्षा माझे अंगी परोपकारी वृत्ती यावी. माझे अंतकरण शुद्ध व्हावे. माझ्यातील लोभ, काम, क्रोध, मत्सर, अहंकार कमी व्हावा. दुःखातही मन दुखी होऊ नये, दुःख हा जीवनाचा एक अपरिहार्य घटक आहे अशी मनाची भावना व्हावी. माझ्यातील हव्यास कमी व्हावा, कष्ट न करता नशिबाने आरामात मिळावे ही भावना नष्ट व्हावी. अशा गोष्टी स्वामी समर्थांकडे मागाव्यात. ज्यामुळे जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत टिकणारी मनशांती मिळेल. मनशांती मिळाल्यामुळे जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनात सौख्य व वैभव आहे. पण मन अशांत असेल तर काय उपयोग. निस्वार्थ भक्तीमुळे मन शांती मिळते म्हणून स्वामी समर्थांचा संदेश आहे. निस्वार्थ भक्ती करा मी तुमच्याजवळच आहे. ‘हम गया नही जिंदा है’ या श्री स्वामी समर्थ वचनांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की ओळख ही त्यांचे वास्तव्य सूचक आहे. महाराज म्हणायचे ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वस्तीस्थान, आणि आमचे नाव नृसिंहभान’ महाराज ज्या वटवृक्षाखाली वटवृक्षाच्या झाडाखाली बसून लोकांचा योग क्षमता चालवीत होते त्या वटवृक्षाला आज खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण याच वटवृक्षाखाली महाराजांच्या निर्गुण पादुका मंदिरात विराजमान आहेत. त्यावर सुंदर मंदिर उभारलेले आहे. श्री वटवृक्ष मंदिर आणि
वटवृक्षाचा संपूर्ण परिसर महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेला आहे. चैतन्याने सारा परिसर भारावलेला आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडे या मंदिराचा कारभार कार्यान्वित आहे.

देवस्थानची भक्ती, सेवा, उपक्रम….

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समिती अनेक उपक्रमांद्वारे भक्तांची सेवा करीत आहे. समितीचे भक्ती सेवा उपक्रम या त्रीसूत्रीस अनुसरून सांगावेसे वाटते की
‘स्वामी कृपेचा वाहतो वारा भक्तांना मिळतो येथे थारा’ या सुविचाराप्रमाणे आज भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे. भक्तांची संख्या वाढली म्हणजे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही देवस्थान समितीची नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून भक्तांच्या देणगी स्वरूपातून एकत्रित झालेल्या निधीतून देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवासाच्या माध्यमातून २२८ खोल्या व ७ प्रशस्त हॉल असलेले सुसज्य भक्तनिवास स्वामी भक्तांच्या सेवेत मोठ्या नम्रतेने उपलब्ध आहे. येथे स्वच्छतेच्या सुविधा उत्तम रीतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. श्री वटवृक्ष स्वामी मंदिराच्या भक्तनिवासात
श्रीगुरुलीलामृत ग्रंथ, स्वामी कृपामृत, चरित्र सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर या सर्व ग्रंथांच्या संदर्भातून स्वामी महाराजांचे चरित्र चित्ररूपातून रेखाटलेले आहे. हे चित्रमय प्रदर्शन अतिशय देखणे रूप धारण करणारे ठरलेले आहे. ‘सगुणी प्रकटने परब्रम्ह’ या नावाने प्रसिद्ध पावलेले आहे. त्याच्या शेजारी देवस्थानच्या वतीने संकल्पीत अन्नदानाची व्यवस्था पुर्वीपासूनच कार्यान्वीत आहे. सुमारे ५०० लोक एकाच वेळी अन्नग्रहणासाठी बसू शकतील एवढा मोठा प्रचंड हॉल, स्वतंत्र स्वयंपाक कक्ष, भक्तांनीच उभा केलेला आहे. भक्तांच्या संकल्प नुसार सण, उत्सव, व्रतवैकल्य, वाढदिवसाप्रित्यर्थ येथे अन्नदान केले जाते. हजारो दिंडी व पालखी सोहळे, पदयात्री, पारायण सप्ताह, हरिनाम सप्ताह या निमित्ताने अन्नदान येथे नेहमी होत असते. आरोग्य सुविधेत ही देवस्थाने श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या सेवेचे योगदान देत आहे. येथे अत्याधुनिक मशीनद्वारे दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा क्ष किरण सेवा, स्त्री रोग निदान करण्याची सुविधा, बालरोग तज्ञ व इतर जनरल आजारांवर उपचार केले जातात. येथे वर्षभरात अनेक होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, ऍलोपॅथिक आरोग्य शिबिरेही भरविले जातात. या माध्यमातून अनेक गरीब व गरजू रुग्णांना लाभ होत आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन सारखे महागडे शिक्षण परवडणारे नाही म्हणून अक्कलकोट तालुक्यातच कै.कल्याणराव इंगळे यांच्या नावे तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती केलेली आहे. गेल्या १६ वर्षांपासून या महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असल्याने देवस्थानच्या वैभवात ही मोठी भर पडलेली आहे. ४६० विद्यार्थी या ठीकाणी ज्ञान प्राप्त करून घेत आहेत. आधुनिक प्रयोगशाळा, तज्ञ प्रशिक्षित शिक्षक वृंद हे या तंत्रनिकेतनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. बाहेरील विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची व्यवस्था करून दिलेली आहे. सुमारे ५६ खोल्यांमधून १६० विद्यार्थी येथे राहतात. त्यांना दिवसाच्या दोन्हीही वेळचे मोफत भोजन दिले जाते. अक्कलकोटची पाणीटंचाई लक्षात घेता महाराजांच्या कृपेने भक्तांच्या देणगीतून वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गळोरगी येथील तलावा शेजारी १००x५० फुटाची महाकाय विहीर निर्मिती करून तेथून हे पाणी पाईपलाईन द्वारे स्वतंत्ररीत्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व श्री वटवृक्ष देवस्थानच्या भक्त निवासात आणलेले आहे. यामुळे २४ तास पाणी महाराजांनी उपलब्ध दिले आहे. पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर झालेली आहे.
ही स्वामी समर्थांची मोठी अपरंपार लिला आहे. ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय’ अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मृदुलाराजे भोसले मुरलीधर मंदिर देवस्थान लगतच आहे. येथे देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या या मंदिरात संस्थानिकांनी स्वतःहून या मंदिराची सूत्रे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराकडे दिलेली आहेत. श्रीकृष्णाच्या या मंदिरात गोकुळाष्टमी, गीता जयंती, आषाढी कार्तिकी वारी, एकादशी, तुकाराम बीज, श्री रामदास नवमी, कोजागिरी पौर्णिमा असे येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. वैष्णवांच्या हजारो दिंडी येथे येऊन हरिनाम सप्ताह करतात. त्यांच्यासाठी निवास व्यवस्थाही उत्तम आहे. आता या ठिकाणी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता दर्शन रांगेचे व सुसज्ज भक्त निवासाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन स्वामी भक्तांच्या सेवेत उपलब्ध होईल.सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी बांधणी असलेले सुंदर इमारत विठ्ठल मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. ते आता देवस्थानच्या अधिपत्याखाली आहे. देवस्थानकडून श्री विठ्ठलाची नित्यपूजा अर्चना, प्रसाद, आरती, महारुद्र, अभिषेक केला जातो. कीर्तन, भजन, दिंड्या येथे सेवेसाठी येत असतात. त्यांची सगळी सोय येथे केली जाते. येथे ५००० हजार चौरस फूट जागा उपलब्ध आहे. सन १९९६ मध्ये गरीब कुटुंबाच्या बालकांच्या शिक्षणासाठी देवस्थानच्या वतीने येथे श्री स्वामी समर्थ शिशु मंदिराची उभारणी केलेली आहे. २५० बालकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मोफत प्रवेश, गणवेश, खेळाचे साहित्य, लहान शिशु व मोठा शिशु यांची स्वतंत्र वर्ग व्यवस्था, प्रशिक्षित शिक्षक वृंद हे या शिशु मंदिराचे ठळक वैशिष्ट्य आहे. स्टेशन रोडवरील संस्थानकालीन श्रीरामाचे मंदिरही देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. तेथे रामरायांची नित्य पूजा, अनुष्ठान, नित्य उपासना हे देवस्थानकडून केले जातात. श्री रामनवमी, रामदास नवमी, इत्यादी उत्सवाला भक्तांची येथे मोठी गर्दी असते. श्रीराम नवमीला येथे भजन, कीर्तन, श्रीराम जन्म सोहळा, महाप्रसाद इत्यादी धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून साजरे केले जातात. श्री स्वामी समर्थांनी गायीची सेवा केलेली आहे. अत्यंत पवित्र अशा गोरस, गोमई, गोमुत्राचा उपयोग स्वामी पूजेस व्हावा, पवित्रता वाढावी यासाठी देवस्थाने भक्त निवासात महाराजांच्या चरणी दान आलेल्या गाईची गोशाळा काढलेली आहे. गोमई पासूनच श्री स्वामींचा अंगारा तयार केला जातो. ही सेवा भक्तांच्या इच्छेनुसार चालविली जाते. श्री स्वामी संदेशात असे म्हटले आहे – मेरे मार्ग पर आकर तो देख, तेरे सब मार्ग न खोल दू तो कहना, तू मेरा बनकर तो देख, हर एक को तेरा न बना दू तो कहना. या संदेशाप्रमाणे राजापासून ते रंकापर्यंत असंख्य स्वामी भक्त आहेत, जे सर्व भक्तांना स्वामी दर्शनाचा, नामस्मरण, ध्यानधारणा या भक्ती सेवेतून मनशांतीचं अनुभव मिळत असतं. सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्याकडून भक्ती सेवा उपक्रम पुरविण्यात धन्य धन्य वाटते.

जिथे कमी तिथे स्वामी

श्री स्वामी समर्थ

श्रीशैल चंद्रकांत गवंडी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button