खरंच राजधानी मुंबईला ‘मुंबई आमची’ म्हणायची का..?
दयानंद गौडगांव , सहसंपादक - गावगाथा

मिरा भाईंदर हे मुंबईमध्ये भाषेच्या कुरुक्षेत्रात अडकलेला एक शहर. तसं पाहिलं तर मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही, पण त्यासाठी किती जणांनी प्राणाची आहुती दिली हे मात्र मराठी माणूस विसरता कामा नये.

मुंबईमध्ये अलिकडच्या काळात भाषा संघर्ष जोरात सुरू आहे. चार मतांसाठी परप्रांतीयांना राजकिय नेत्यांचा पाठिंबा असेल असा एकंदरीत दिसून येतो. त्याला कारणही तसंच आहे. कारण, ज्या दिवशी एका परप्रांतीय / परभाषिक दुकानदाराच्या कानाखाली मराठी माणसाने आवाज काढला त्याविरोधात संपूर्ण परप्रांतीय एकवटतो आणि मोर्चा काढतो, सगळी दुकानं बंद ठेवली जातात, त्या मोर्चेसाठी मुंबई पोलिस परवानगीही देतात. मात्र जी मराठी भाषा, भाषेचा अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यास निघालेल्या एका मराठी एकीकरण समितीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. याशिवाय मध्यरात्री, पहाटे जाऊन मराठी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.

त्या परप्रांतीयांनी आपली आर्थिक ताकद दाखवून मुंबईतल्या मराठी माणासाच्या नाकावर टिच्चून मोर्चा काढला आणि इथल्या भुमि पुत्रांना तुम्ही मोर्चा काढू दिला नाही, मराठी माणासांना तिथे घरे नाकारली जातात, मराठी माणसांच्या कार्यक्रमात अडथळा आणला जातो, हा अपमान मराठी माणसाने कसा सहन करावा..?

२०११ च्या जनगणना नुसार मिरा भाईंदर मध्ये मराठी माणसांची संख्या ही सरासरी ३० % इतकी होती. १४ वर्षाआधीच तिथे मराठीच अस्तित्व धोक्यात असल्याचं समजलं होतं , आता काय परिस्थिती असेल ते पुढील जनगणेत कळेलच. पण वाढत चाललेल्या या परभाषिकांची दादागिरी थांबायचं नाव घेत नाही आहे आणि मराठी माणसाला , मराठी भाषेचा इतका छळ केला जातोय की, सत्ताधारी त्याचा साधा निषेधही करत नाहीत, याऊलट मराठी अस्मितेसाठी झटणाऱ्या संघटनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. यामुळे मराठी माणसाला प्रश्न पडलाय की , या राजधानी मुंबईला ‘मुंबई आमचीच’ म्हणावं का..?
