गावगाथा

श्रीमद् भागवत मानवी जीवन कृतार्थ बनविणारा ग्रंथ – ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ

श्रावण मासानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये आयोजित भागवत कथा सप्ताह सेवेत अंबडचे श्रीहरी महाराज रसाळ यांचे निरुपण.

श्रीमद् भागवत मानवी जीवन कृतार्थ बनविणारा ग्रंथ – ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ

श्रावण मासानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये आयोजित भागवत कथा सप्ताह सेवेत अंबडचे श्रीहरी महाराज रसाळ यांचे निरुपण.

(श्रीशैल गवंडी, दि.३१/०७/२०२५.अ.कोट)
आधुनिक विज्ञान युगात निरस व बेचैन झालेल्या मानवी जीवनामध्ये सुख, समाधान निर्माण करुन मानवाच्या जीवनासोबतच त्याचा मृत्यूही मंगलमय बनविण्याची किमया भागवत ग्रंथामध्ये आहे असे निरुपण जालना जिल्ह्यातील अंबड येथील ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ यांनी केले, ते येथील श्री स्वामी समर्थांचे मुळ स्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात श्रावणमासा निमित्त दिनांक – २५/७/२०२५ ते दिनांक – ३१/०७/२०२५ अखेर भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेल्या पहिल्या सप्ताहात निरुपण करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभी वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा सपत्नीक स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचीत सन्मान केला.
पुढे बोलताना श्रीहरी महाराज यांनी श्रवण भक्तीतून कशी मुक्ती मिळविता येते हे परिक्षित राजाच्या उदाहरणतून दिसुन येते. गीता हे मानवी जीवन कसं जगावं हे शिकविते तर भागवत जगणं संपल्यावर कसं मृत्युशी एकरुप व्हावं हे शिकविते. भागवतामधील प्रत्येक कथा ही मनुष्याला भगवंताच्या प्राप्तीची अतिशय सुलभतेने कशी प्राप्त होते हे दाखवते. भरत राजाच्या कथेतून जन्म मरणाच्या फेरीतून कसे मोक्ष मिळवावे. गजेंद्र कथेतून पशू पक्षांवरही भगवंताची कृपा कशी होते याचेही विश्लेषण त्यांनी भागवत कथेच्या माध्यमातून केले. मनुष्याने संसारात राहुन परमार्थ कसा करावा याचीही शिकवण भागवतातुन भविष्यातही युगानुयुगे मिळत राहील. महापापी असणारा अजामेळ याचा उध्दार नामचिंतनामुळे झाला असल्याने आजच्या कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ आणि सोपा उपाय म्हणजे भगवंताचे नामचिंतन होय. या नामचिंतनासोबत श्रीमद भागवत गीतेची नित्य आराधना केल्यास मनुष्य जन्म सार्थकी होईल, तसेच निरव्यसनी जीवन, आई वडीलांची सेवा, साधुसंत सेवा, देशसेवा, आणि धर्मरक्षण करीत मानवी जीवनाची मुल्यं जपत शेवटी आपला मृत्यु मंगलमय व्हावा यासाठी गीता आणि भागवत या ग्रंथाचे श्रवण नित्य करावे हाच संदेश आम्हाला संतांनी पण दिला असून संतांची ही विचार सारणी आजच्या तरुणांनीही अंगिकारावी असेही विवेचन करून श्रीहरी महाराजांनी वटवृक्ष मंदिरातील भागवत कथा सप्ताहाची सांगता केली. या कार्यक्रमात त्यांना गायनसेवेत सचिन बचाटे, तबला सेवेत विष्णु आदिड यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमास प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, मोहन जाधव, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, अमर पाटील, आदींसह हजारो भाविकांनी उपस्थित राहुन या कथा श्रवणाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button