अक्कलकोटसह ग्रामीण भागात “वेळ अमावास्या” उत्साहात साजरा

अक्कलकोट, दि.१९ (प्रतिनिधी): बळी राजा आणि ग्रामीण संस्कृतीतील उत्साही सणांमध्ये एक असलेला “वेळ अमावास्या” सण अक्कलकोट तालुका आणि ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात आला.
आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरात पंच पक्वान्नाला लाजवेल असा पौष्टिक आहार तयार असतो. यात प्रामुख्याने बाजरीच्या पिठापासून तयार करून उकडलेले उंडे ( ग्रामीण भाषेत कडबा), त्यासोबत सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या व कडधान्य यांचा एकत्र मिश्रण करून बनविलेली भाजी (ग्रामीण भाषेत भज्जी) ही या जेवणाची खासियत आहे. हे सर्व पदार्थ बनवून आपापल्या शेतात जाऊन शेतीची पुजा करून संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला जातो.
महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, लातूर आणि सांगली त्यानंतर उत्तर कर्नाटकातील काही भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या व कडधान्यांचे मिश्रण असलेली भाजी वर्षातून केवळ एकदाच खाता येते, यादिवशी या भाजीची चवच न्यारी असते. म्हणून ग्रामीण भागात या सणाला एक विशेष महत्त्व आहे.



