कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन.ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी अमई महालिंगा नाईक.
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन..

कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन..

‘ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी अमई महालिंगा नाईक.
परवा परवा त्यांना कृषी क्षेत्रातला पद्मश्री जाहीर झालायं. शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात हे साध्य केलंय. आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत
कर्नाटकमधील अद्यानाडकाजवळचं एक छोटं खेडेगाव. गावातील एका श्रीमंत शेतकऱ्याकडे एक शेतमजूर काम कारायचा. त्याच्या नारळ आणि सुपारीच्या बागेत हा मजूर ईमानदारीने काबाडकष्ट करत असे. त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी त्या शेतमजूराला आपला डोंगरावरील पडीक पडलेला शेताचा तुकडा बक्षीस म्हणून दिला. पण त्या माळरानावर पाण्याचा मोठा प्रश्न होता. तरीही या अवलियाने तिथे सुपारीचा बाग लावण्याचं स्वप्न बघितलं आणि तिथूनंच सुरु झाला प्रवास संघर्षाचा आणि एका अनोख्या कहानीचा.
साधारण १९७८ सालची ही कहानी. त्या मजूराला शेताचा तुकडा मिळाला होता खरा पण पाण्याचा प्रश्न आ वासून त्याच्या समोर उभा होता. आपल्यासारखा एखादा असता तर हा शेतीचा नाद कधीच सोडून दिला असता, पण म्हणतात ना ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होतीं’ याप्रमाणे त्याने हार न मानता काम चालू ठेवलं. त्याने त्या माळरानावर राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली. ती जमीन सपाट करून घेतली. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्याने पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. मालकाच्या शेतातील काम सुरुच होतं. दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचं आणि काम संपलं की चर खोदण्याचं काम करणं हे त्याचं रोज सुरु होतं. हे काम रोज रात्री ९ वाजेपर्यंत चालायचं. मग हा अवलिया जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचा.
असं करत करत त्याने पहिला बोगदा २० मीटरपर्यंत खोदल्यानंतर कोसळला. तब्बल २ वर्षे खोदण्याचं काम करुनही त्याच्या हाताला काहीच मिळालं नाही. त्यानंतर सलग सहा वर्षात असे ४ बोगदे कोसळल्यानंतरही त्याने माघार घेतली नाही. मग त्याच्या नंतरच्या बोगद्याने या अवलियापुढे हार मानली आणि तब्बल ३० फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परत ते पाणी शेतापर्यंत आणण्याचं आव्हान होतंच. मग त्याने एक शक्क लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करुन बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणलं आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.
सुमारे आठ वर्षातील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. या आठ वर्षात त्याला लोकांना नाव ठेवलं, पण त्याने या बोलण्याकडे लक्ष न देता काम केलं आणि त्याच्या ओसाड माळरानावर सोनं पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. त्यानंतर त्याने आपल्या शेतात सुपारी, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेलं पाणी शेतासाठी पुरंत होतं. हाच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी म्हणजेच आजचा अमई महालिंगा नाईक !
याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज ३०० पेक्षा जास्त सुपारीची, ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, २०० केळीची आणि काही काळी मिरचीची झाडं आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय. म्हणून जगभर त्यांना ‘टनेल मॅन’ म्हणून ओळख निर्माण झालीय. नाईक यांनी आल्या जिद्दने शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचं वय ७२ वर्षे इतकं आहे. आजही नाईक स्वत: शेतातली सगळी कामं करतात. आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात हे विशेष.
