अक्कलकोट हत्ती तलावाचे सांडपाणी वाहणार्या संस्थानकालीन पुलाच्या नूतनीकरणाचे काम अखेर नगरपरिषदेने हाती घेतले
45 दिवस चालणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

अक्कलकोट हत्ती तलावाचे सांडपाणी वाहणार्या संस्थानकालीन पुलाच्या नूतनीकरणाचे काम अखेर नगरपरिषदेने हाती घेतले

45 दिवस चालणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

अक्कलकोट, दि.20 : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गावरील न.प.च्या धर्मशाळेलगत हत्ती तलावाचे सांडपाणी वाहणार्या संस्थानकालीन पुलाच्या नूतनीकरणाचे काम अखेर नगरपरिषदेने हाती घेतले असून हे काम 45 दिवस चालणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
संस्थानकालीन हत्ती तलाव भरल्यानंतर ओव्हरफ्लो होणार्या पाण्याच्या सांडव्याकरिता सदरचा पुल उपयोगात यायचा. याकरिता सदरचे काम नव्याने करण्याकरिता नाला सरळीकरण अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेले होते. गेल्या अनेक वर्षापासून सदरचे काम ठेकेदाराकडून अर्धवट स्थितीत ठेवल्याने त्यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे न जाता तेथेच थांबत असल्याने दुर्गंधी पसरुन परिसरातील रहिवाशांसह स्वामी भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीची देखील कोंडी होत होती. अखेर नगरपरिषदेने याची दखल घेवून अण्णासाहेब साठे या योजने अंतर्गत रु.26 लाख खर्चाच्या पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी वाढती गर्दी पाहता नगरपरिषद प्रशासनाने शहरवासियांसह स्वामी भक्तांना पर्यायी मार्ग म्हणून सोलापूर रोड बायपास व माणिक पेठ येथे मार्गक्रमण करण्याची सूचविण्यात आलेले आहे. मात्र माणिक पेठ येथील रस्ता अरुंद व अडचणीचा असून तो मार्ग मोकळा करणेकामी नगरपरिषदेने तातडीने पावले उचलून सदरचा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी पुढे येत आहे.
सदरच्या रस्त्यावरील वर्दळ पाहता नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा म्हणून सदरील काम संथगतीने न होता मुंबई-पुणेच्या धरतीवर रात्रंदिवस काम करुन अवघ्या चार दिवसात काम संपविण्याची मागणी स्वामी भक्त व अक्कलकोट शहरवासियांतून होत आहे.
सध्याच्या घडीला उन्हाळ्याची सुट्टी सरत असताना श्रींच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता यासह दि.3 जुलै गुरुपौर्णिमा असून यानिमित्त होणारी श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दीची प्रमाण पाहता सदरचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे.
तरी नगरपरिषदेने मुंबई-पुणेच्या धरतीवर सदरचे काम रात्रंदिवस जलदगतीने करावे अन्यथा स्वामी भक्त व शहरवासियांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
जुन्या काळातील नगपरिषद पदाधिकार्यांनी भविष्यातील वाढती गर्दी पाहता त्याकाळात धर्मशाळा अद्यावत बांधकाम करण्यात आलेले होते. मात्र याकडे गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याने धर्मशाळा नव्हे तर कोंडवाडा झाला असून हजारो स्क्वेअरफुटची जागा नगरपरिषदेची विकासाविना पडीक पाडलेली आहे. याबाबत देखील नगरपरिषद प्रशासनाने त्वरीत लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.
