Love marriage: बल्ले बल्ले…! पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारचा नवीन कायदा….

(प्रतिनिधी ): प्रेमाच्या बंधनाला जाती-धर्माचे अडथळे पार करून विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी, अशा नवविवाहित जोडप्यांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ उभारण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

‘ऑनर किलिंग’च्या घटना आणि उपाययोजना
गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड जिल्ह्यांत ‘ऑनर किलिंग’च्या चार घटनांनी खळबळ उडवली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यांवर मात करण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ‘सेफ हाऊस’ उभारण्याचे आदेश जारी केले आहेत.


‘सेफ हाऊस’ची सुरक्षा आणि सुविधा
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर जर नवविवाहित दाम्पत्याच्या जीवाला कुटुंबीय किंवा समाजाकडून धोका असेल, तर त्यांना ‘सेफ हाऊस’मध्ये तात्पुरते आश्रय दिला जाईल. येथे सशस्त्र पोलिसांचा 24 तास पहारा असेल.

‘सेफ हाऊस’मध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.नवविवाहित दाम्पत्य येथे एक महिना ते एक वर्ष राहू शकते.
पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय उभारणी सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल. या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांत ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
सामाजिक संस्थांचा पाठिंबा
महाराष्ट्र अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) या उपक्रमाचे स्वागत करताना डॉ. हमीद दाभोळकर यांनी बोलताना सांगितलं की, “सरकारचा निर्णय योग्य असून, ‘सेफ हाऊस’ केवळ औपचारिकता ठरू नये. नवदाम्पत्यांना विश्वास वाटावा अशी ही सुविधा असावी. शासनाला लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही नेहमी तयार आहोत.”
‘सेफ हाऊस’ ही योजना समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सरकारचा हा निर्णय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी आधारभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.