पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात ; स्वामी भक्ताची मागणी
अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज वाढत चाललेल्या गर्दीचे नियोजन हवे

पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात ; स्वामी भक्ताची मागणी


🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*यंदाची कार्तिकी यात्रा प्रशासनाकडून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्या पद्दतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या, त्या पद्दतीने श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज वाढत चाललेल्या गर्दीमुळे स्थानिक प्रशासन हात टेकल्याने स्वामी भक्तांना नाहक त्रास होत आहे. याकरिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात याकरिता तातडीने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.


राज्यातला टॉप फाईव्ह मधील तीर्थक्षेत अक्कलकोट असून, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यासह पर राज्य, देश-विदेशातून वाढती भाविक संख्या पाहता राज्यातल्या अन्य तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास होणे गरजेच आहे. सन १९९५ ला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. गेल्या २९ वर्षात म्हणावा तसा विकास झालेला नांही. त्यावेळेच्या विकास आराखड्या प्रमाणे थोडा जरी विकास झाला असता तर आज प्रशासनावर ताण पडला नसता. अशी टिप्पणी माजी सनदी अधिकार्याकडून गेल्या आठ दिवसा पूर्वी झालेली गर्दी पाहून त्यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाकडून पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, शेगांव आदी ठिकाणाचा तीर्थक्षेत्र विकास निधी, यात्रा अनुदान पाहता आजतागायत निधीची कमतरता श्रीक्षेत्र अक्कलकोटला भासली आहे. नुकतेच राज्य सरकारकडून रुपये ३६८ कोटीचा निधी मिळालेला आहे. मात्र तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत घेण्यात आलेल्या कामांचे प्रस्ताव नगर परिषदेकडून जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा पालिका शाखा यांच्या कडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी लवकरच जाणार असल्याचे पालिका सूत्राकडून सांगण्यात आले.
विकास कामांना मंजुरी मिळेल हे जरी निश्चित असले तरी सध्याच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याकामी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवा. सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी, पोर्णिमा व सलग सुट्यांच्या दिवशी प्रचंड भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, बुधवार पेठेतील समाधी मठ (चोळप्पा मठ), श्री गुरु मंदिर (बाळप्पा मठ) याठिकाणची भोगोलिक परिस्थितीमुळे स्वामी भक्तांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भाविकांना ज्या काही सुविधा द्यायच्या आहे त्या सुलभ देण्याकामी पाऊले उचलावीत, यामध्ये परिसरातील अतिक्रमण काढण्याकामी प्राधान्य द्यावेत, भक्तांना राहण्याकरिता प्रशासकीय सोयीसुविधा नांही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पर्यटन विकास महा मंडळाची प्रशस्त इमारत असून त्याला कबाड खाण्याचे स्वरूप आलेले आहे. ते जरी भक्तांच्या सेवेत असले असते तर निवासाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली असती.
गेल्या १५ दिवसातील गर्दी मध्ये अनेक भाविकांना निवासा अभावी भर रस्त्यावर काढावे लागले आहे. या महा मंडळाच्या विश्राम गृहास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन पहाणी करावी व लवकरात लवकर भक्तांना निवासाची व्यवस्था करण्याकामी तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्वामी भाक्तातून होत आहे.
नुकतेच पर्यटन विकास महा मंडळाच्या प्रशस्त इमारतीला आलेल्या कळा बाबत उपविभागीय अधिकारी तथा जिल्हा पर्यटन अधिकारी विठ्ठलराव उदमले यांनी भेट देऊन पहाणी केले. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नांही. पंढरपूर प्रमाणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे देखील नगर पालिका, पोलीस प्रशासन, तहसीलदार, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, समाधी मठ, राजेराय मठ, श्री गुरु मंदिर यांच्या माध्यमातून भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बाबत सातत्याने आढावा घेऊन संबंधीत अधिकारी, पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवणे आवश्यक असल्याचे भाविकातून बोलले जात आहे.
भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, वाहन तळ, शहर स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. स्थानिक व तरंगती लोकसंखेच्या अनुसंगाने तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास होणे गरजेचे आहे. दिवाळी सुट्टी ते त्रिपुरारी पोर्णिमा पर्यंत अक्कलकोटला येणाऱ्या भक्तांची संख्या ही २० लाखाहून अधिक असल्याचे प्रशासन सूत्राकडून सांगण्यात आले.
*⭕चौकट :*
*आमची रास्त मागणी :*
आम्ही स्वामी भक्त राज्यासह परराज्य व देश-विदेशातून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास्ठी गेल्या अनेक वर्षापासून श्रीक्षेत्र अक्कलकोटला येतो. मात्र येथील आवश्यक त्या सोयीसुविधा चा वणवा आजही कायम आहे. ही परिस्थिती बदलणार का..? असा सवाल वाढत चाललेल्या गर्दीच्या निमित्ताने प्रशासनाला आम्ही स्वामी भक्त म्हणून विचारत आहोत. येत्या कांही दिवसात परिस्थितीमध्ये बदल व्हायला हवा. अन्यथा सकल स्वामी भक्तांच्या रोषास प्रशासन जबाबदार राहील..!
*-आशिष कोळंबकर*
स्वामी भक्त, अलिबाग रायगड