
गणेश हिरवे सुवर्ण महोत्सवा निमित्ताने

रत्नकांत विचारे
कुर्ला मुंबई

मोहरलेला एक आम्रवृक्ष अवघं ऐलपैल सुगंधित करतो. कोकिळेचा एक आर्त मधुर स्वर वसंत ऋतुच्या आगमनाची ग्वाही देतो. पुनवेची पहिली कोमल किरणं वातावरण मंत्र मोहित करतात. नेमकी अशीच किमया सन्मा गणेश वसंत हिरवे सर आपण आपल्या मित्रमंडळी परिवारात केलीत.
परंपरागत सांस्कृतिक वारसा लाभलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील ‘नारायणगाव’ हे आपले मुळगाव. परंतु आपला जन्म मुंबई आणि कार्यही मुंबईतील जनसामान्यांसाठीच. आपण बांद्र्याच्या सेंट तेरेसा बॉईज हायस्कूलमध्ये नोकरीला लागलात. एवढ्यावरच आपण न थांबता जॉय ऑफ गिविंग’ सारखी सामाजिक संस्था काढून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवलेत.गरजू, वंचित, आदिवासी लोकांना अर्थसहाय्य, धान्य वस्तू वाटप, कोरोना काळात सर्व प्रकारची गरजूंना मदत आपण केलीत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलेत.
नम्र व्यक्तीमत्व, हसतमुख, नेहमी प्रसन्न वृत्ती आणि नवनिर्माणक्षम प्रतिभा यांचं अमोल देणं आपणास लाभलेलं आहे. या दैवी संपत्तीचा उपयोग करून आपण अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केलात.
हिरवे सर म्हणजे शांत, संयमी, साधेपणा, विद्वत्ता, निष्ठा आणि जाणकार गुणीजणांकडून प्राप्त झालेली मान्यता यांचे समतोल मिश्रण. आपण सृजनशील गुरुजीच नाहीत तर दैवी कृपेचा स्पर्श झालेले समाजसेवक ही आहात. ‘रक्तदान म्हणजेच जीवनदान’ असे कृतीतून सिद्ध करणाऱ्या अवलियाने अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारीताही करून मैलाचा दगड पार केला. आपला सुवर्ण महोत्सवी पन्नासावा वाढदिवस ‘नित्यानंद वृद्धाश्रम’ मीरा रोड येथे साजरा करणं, सर्व सहकारी व सर्व थरातील मित्रांना साथीला घेऊन चालणं आणि शैक्षणिक गुणवत्तापूर्वक कामांचा सर्वांपुढे आदर्श निर्माण करणं हे सर्व अपूर्व आहे सर !!!
लोक प्रेम आपणास आयुष्यात उदंड लाभलं. समाजसेवा व समाज प्रबोधन अशी पायाभूत कामे करीत असताना आपणापाशी अहंकाराचा लवलेश नाही. सर, ज्ञानदानाच्या या निरंतर कार्यातूनच आपणास ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ ‘मानव कल्याण समाजभूषण पुरस्कार’ आदर्श रक्तदाता पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार आणि असे अनेक शेकडो पुरस्कार सन्मानपूर्वक प्राप्त झाले.
तुमच्या वागण्या बोलण्यात काय किंवा मैत्रीचा सेतू जोडण्यात काय कोठेही कृत्रिमतेचा स्पर्श नाही. जे आहे ते उमाळ्याचं, रानझर्यासारखं उफाळून आलेलं, रानफुलांसारखं टवटवीत रंग धारण करणारं अस्सल बाजाच आहे.
सर प्रतिभा, चारित्र्य आणि दानत यांची एकाच ठिकाणी बेरीज व्हायला खूप मोठी पुण्याई लागते. आपल्या या कर्तृत्वाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. कौटुंबिक सहकार्याची झुळझुळते झरे आणि सुखाची वत्सल सावली असल्याखेरीज अशी काम हातून होत नाहीत.
या वैभवशाली वाटचालीत तुमची अखंड पाठराखंड केली ती लक्ष्मी, अलंकृत संतोषी, सहधर्मचारिणी सौ. योगिता वहिनी यांनी. एकाहून एक सरस कन्या कु. गार्गी व पुत्र चिरंजीव प्रियान्स यांनी. यांच्या बळावरच आपण एथवर पोहोचला आहात.
सर आपण आपल्या कर्तबगार जीवनाचे शतक पूर्ण करावे. यापुढील आपले जीवन शांत, सन्मानाचे, निरामय आरोग्य संपन्नतेचे आणि निर्वैर भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना…!!!
