*निरागस मैत्रीचा दरवळणारा सुगंध : कॉलेज कट्टा*
कॉलेज कट्टा ही कॉलेज जीवनाची अनुभूती देणारी कादंबरी

*पुस्तकाचे नाव -* कॉलेज कट्टा / कादंबरी
*लेखक-* सचिन बेंडभर
*प्रकाशन-* पार्टनर पब्लिकेशन, मुंबई
*पाने-* 184
*किंमत -* 280 रुपये
*आवृत्ती-* फेब्रुवारी 2024
*समीक्षक-* प्रा. कुंडलिक शांताराम कदम
——————————-
*निरागस मैत्रीचा दरवळणारा सुगंध : कॉलेज कट्टा*
कॉलेज कट्टा ही कॉलेज जीवनाची अनुभूती देणारी कादंबरी आहे. कादंबरीचे लेखक युवा साहित्यिक सचिन बेंडभर हे साहित्य विश्वातील एक परिचित नाव आहे. पन्नासपेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. साहित्यातील कथा, कादंबरी, ललित, काव्य, अनुवाद, बालसाहित्य, संपादन यांसारख्या अनेक प्रकारात त्यांनी लेखन केले आहे.
कॉलेज कट्टा कॉलेज जीवनाची अनुभूती देणारी कादंबरी आहे. कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून आलेले विध्यार्थी जेव्हा शिक्षण घेण्यासाठी येतात तेव्हा कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्यांच्यात बहारणारी मैत्री लेखकांनी यात मांडली आहे. जीवनाच्या वाटेवर कॉलेज जीवनाचा टप्पा एक महत्वाचा टप्पा असतो. आयुष्याला दिशा देणारा हा टप्पा असतो. या काळात घेतलेले शिक्षण आयुष्याला एक वेगळे वळण देत असते. आयुष्यात घडण्याचा आणि बिघडण्याचा हा काळ असतो. या काळात होणारी मैत्री ही अधिक घट्ट असते.
बाहेरगावावरून येऊन शिक्षण घेणे ही तशी अवघड गोष्ट असते. शिक्षणाचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी सगळे विध्यार्थी आलेले असतात. जर कॉलेजला हॉस्टेल असेल तर वेगळी गोष्ट असते. तिथे बऱ्यापैकी सुविधा असतात. पण यात स्वतंत्रपणे खोली घेऊन राहणारे विद्यार्थी पाहायला मिळतात. भाड्याने खोली घेऊन राहून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण करताना जे अनुभव आले आहेत ते यात रेखाटले आहेत.
कादंबरीची सुरुवात करताना कॉलेज संपल्यानंतर अनेक वर्षांनी विजय नावाचा त्यांचा मित्र हॉस्पिटलमध्ये सिरीयस असतो. तेव्हा त्याला भेटायला गेल्यावर त्यांना कॉलेजचे दिवस आठवतात व कादंबरीच्या कथानकाला सुरुवात होते. यात राजवीर हा कादंबरीचा नायक आहे. त्याच्या बरोबर असणारे योगेश, प्रशांत, विजय,राजू, भीमा आणि इतर मित्रांची मैत्री यात वाचायला मिळते. वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र असल्याने त्यांच्या वागण्याबोलण्याच्या तऱ्हा निराळ्या आहेत. कौटुंबिक वातावरण वेगळे असले तरी मैत्रीचा समान धागा त्यात आहेत. कथानक खुलावताना कॉलेजमधील शिक्षक कसे होते, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, बोलण्याच्या लकबी, सवयी यातून चांगली वातावरण निर्मिती केली आहे. आपल्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी प्राचार्य धायगुडे सरांनी केलेली युक्ती मनाला भावते.
कॉलेजचे शिक्षण घेत असताना केवळच शिक्षणच घेतलं जात नाही तर कॉलेजमध्ये होणारी वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम यामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. यातून मुलांचा व्यक्तिमत्व विकास कसा होतो व जीवनामध्ये खिलाडू वृत्ती कशी वाढते हे अनेक प्रसंगातून आपल्याला समजते.
जेव्हा शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असतो तेव्हा जेवणाचं महत्व किती असतं याचा अनुभव अनेक प्रसंगावरून येतो.
यात कॉलेजमध्ये शिकणारी मुले असली तरी जीवन कसं असत याविषयी भाष्य करताना भीमाचे वाक्य जीवनातील एक सत्य सांगून जाते,
“राजा, सुरुवात आपल्यापासून करायची मग सगळं होतं. पायाला चटके बसले म्हणून कोणी जमिनीवर चामडे अंथरत नाही. स्वतःच्या पायात चपला घातल्या जातात. सुरुवात स्वतःपासून केली की सर्व शक्य आहे. गरज आहे फक्त दृढ इच्छाशक्तीची.”
खोलीवर राहताना “तिसरा पार्टनर“ या आयडियाचा केलेला वापर वाचून हसू येते. मुलांच्या कल्पनाशक्तीला दाद देता येते.
मॅडमचा तास चालू असताना अचानक आलेला फोन घेण्यासाठी केलेली आयडिया आणि त्यातून निर्माण झालेला विनोद हे वाचून आपल्यालाही आपल्या कॉलेज जीवनातील काही विनोदी प्रसंग आठवतात. उकसान गावात गेलेले शिबीर आणि त्यातील एकूणच कार्यक्रम यातून श्रम संस्कार आणि व्यक्तिमत्व याची सांगड घातली आहे.
सुवर्णां आणि राजवीर यांची एक छोटीशी प्रेम कहानी यात लेखकाने दाखवलेली आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असताना मित्रांमध्ये होणारे समज गैरसमज लेखकाने यात मांडले आहेत. बऱ्याच गोष्टी मैत्रीला हानिकारक असतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत हे अनेक प्रसंगात यात दाखवले आहे. आजचा दिवस असाच गेला असं नकारात्मक वाक्य आणि ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही या सकारात्मक वाक्याचा किती आणि कसा परिणाम होतो, हे लेखकाने खुबीने मांडले आहे.
कॉलेज जीवनाचा काळ म्हणजे तारुण्याचा काळ, या काळात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना घडलेले छोटे छोटे प्रसंग, घटना यात लेखकाने मांडल्या आहेत. त्या छोट्या मोठ्या घटनांमधून एक चांगला आणि सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण कादंबरीत एक सकारात्मक जीवनाचा संदेश दिला आहे. ज्यांनी कॉलेज केले नाही त्यांना कॉलेज जीवन अनुभवण्यासाठी व ज्यांनी कॉलेज जीवनाचा अनुभव घेतलेला आहे, त्यांच्यासाठी पुन्हा कॉलेज जीवन नव्याने अनुभवाची एक वेगळी संधी ही कादंबरी आपल्याला देते. कॉलेजकाळात मैत्रीचे जे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतात ते किती घट्ट असतात याची प्रचिती विजयच्या रूपाने आपल्याला येते.
——————————-
