गावगाथा

आचार्य अत्रे यांच्या १२५ जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने

आचार्य अत्रे यांच्या १२५ जयंती वर्षानिमित्त
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा

HTML img Tag Simply Easy Learning    

आचार्य अत्रे म्हणजे मराठी अस्मितेचे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे बलदंड प्रतीक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा काळ हा आचार्य अत्रे यांच्या जीवनातील तेजस्वी व भाग्यशाली काळ होय. घणाघाती वाणी, ओघवती लेखणी, महाराष्ट्राविषयी अनन्य निष्ठा, त्या महाराष्ट्रावर अन्याय झालेला पाहून येणारा सात्त्विक संताप, त्या संतापातून लेखणीद्वारा प्रकट झालेला आवेश, प्रतिपक्षाचे वाभाडे काढणारा विनोद इत्यादी सारे गुण आचार्य अत्र्यांच्या वाणी-लेखणीतून प्रकर्षाने प्रतीत होत. समोरच्याला गारद करण्याची अत्रेसाहेबांची एक विलक्षण धाटणी होती. ‘मराठा’तील अग्रलेखांच्या माध्यमातून तरुणांना या लढ्यासाठी चेतविण्याचे काम केले. त्यांच्यातील स्पष्टवक्त्या पत्रकाराने आणि लेखकाने कधीही कुणाची भीती बाळगली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान त्यांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांची भाषणे म्हणजे त्यांच्या ह्या निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणाचे उत्तम उदाहरण होते. अग्रलेख लिहिताना कधी त्यांनी कुणाचे वस्त्रहरण केले, कुणाला शालजोडीत हाणले, तर कधी मार्मिकपणे तर कधी दरडावून कोणाचीही पर्वा न करता सडेतोड विचार मांडले.
या राज्याला स्व. यशवंतरावांपासून अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत फार मोठी आदर्शवत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा लौकिक रसातळाला घेऊन जात आज त्या आदर्शांची मोडतोड पावलोपावली होताना दिसते आहे. सध्याचे महाराष्ष्ट्रातील राजकीय वातावरण मराठी माणसाला अस्वस्थ करणारे आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पटलावर मती गुंग करणाऱ्या घटना घडत आहेत. सध्या चाललेला हा सर्वपक्षीय गोंधळ पाहिल्यास लोकशाहीची बूज राखण्यासाठी मतदारांवर मोठी जबाबदारी येणार आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या ‘तोडा-फोडा-मोडा-झोडा-राडा-आणि मग परत जोडा’ या प्रवृत्तीवर आचार्य अत्रे यांनी मराठामधून अग्रलेख कसा लिहिला असता. अत्रेसाहेबांच्या लेखणीला आपली सर येणार नाही, परंतु “सध्याची राजकीय परिस्थिती” यावर ते कसे व्यक्त झाले असते हे ते अग्रलेखाच्या स्वरूपात लिहून पाठवा.
आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या ( शतकोत्तर रौप्यमहोत्सवी ) जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे.
आचार्य अत्रे यांचा निकटचा सहवास लाभलेले मुंबई वरळी कोळीवाड्यातील विक्रमी नगरसेवक दिवंगत कॉ. मणिशंकर कवठे यांच्या स्मरणार्थ निशुल्क स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रदीप कवठे पुरस्कृत या स्पर्धेची शब्दमर्यादा ६०० असून युनिकोड मराठी टायपिंग करून chalval1949@gmail.com यावर अथवा राजन देसाई 8779983390 या मोबाईलवर दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत लेख पाठवावा. पहिल्या ५ स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेतील सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व नागरिक भाग घेऊ शकतात तसेच अधिक माहितीसाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांच्याशी 8652100400 संपर्क साधावा.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button