तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदान

तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदान

हिवरे बाजार– तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला. श्रमदानात ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळ, विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. हिवरे बाजार येथील श्रमदानाचे इतर गावांनी अवलोकन केले तर इतरही गावे पाणीदार व स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.

आदर्श गाव हिवरे बाजार येथे १२ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. हिवरे बाजार येथील ५१ वर्षापूर्वी सन १९७२ च्या दुष्काळात तयार केलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. यावेळी सालीमठ बोलत होते. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पाडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपअभियंता डी. के. ठुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, श्रमदानासारख्या उपक्रमातून गावागावात एकोपा निर्माण होतो. यातून विविध विकास कामे गुणवत्तादायी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार २.० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रकारची जलसंधारणाची कामे हिवरे बाजार धर्तीवर करण्यात येतील.
येरेकर म्हणाले, श्रमशक्तीतून काय साकार होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिवरे बाजार गाव आहे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून हिवरे बाजार सारखी गावे महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करत आहेत. हिवरे बाजारचे ग्रामविकासाचे मॉडेल इतर गावात राबविल्यास गावे लवकरच सुजलाम सुफलाम होतील.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, गावकर्यांना दुष्काळात जगविण्यासाठी पाझर तलावाचे काम करण्यात आले. लोकांना जगविणे एवढेच ध्येय असल्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा या दृष्टीने न पाहिल्याने पाझर तलावास गळतीचे प्रमाण मोठे होते. वेळोवेळी पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून या कामास मंजुरी मिळाली. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे पाझर तलाव क्रमांक १ दुरुस्तीचे काम सन २०२३ मध्ये करण्यात आले. हिवरे बाजारमध्ये मृद्संधारण, जलसंधारण, वनसंवर्धन ही कामे शास्त्रोक्त पद्धतीने दर्जेदार झाल्यामुळे गाव दारिद्रयमुक्त व स्थलांतरमुक्त झाले. एक समृद्ध गाव व स्वावलंबी झाले. १९८९ पासून हिवरे बाजारमध्ये आजपर्यंत गेली ३३ वर्षे अखंडपणे श्रमदान सुरू आहे. श्रमदान आणि लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट अशी गुणवत्तादायी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. हिवरे बाजार येथील संदीप गुलाब ठाणगे यांचा शुभविवाह होता परंतु नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान केले मगच लग्नविधी पार पडला.
