Pune : राज्यात बाईक टॅक्सीला हिरवा कंदील ; रिक्षाचालकांचा विरोध
पुणे (प्रतिनिधी): राज्यातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बाईक टॅक्सी फायदेशीर ठरू शकते. पुण्यात रेपिडो कंपनीने सुरू केलेल्या बाईक टॅक्सीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगिती आणण्यात आली होती.

दरम्यान प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. परिणामी रॅपिडो, ओला, उबर आदी अॅप आधारित प्रवाशी सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मुंबई महानगर प्रदेशासह, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश तसेच अन्य मोठ्या शहरात बाइक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या बाईक टॅक्सीला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने बाईक टॅक्सीबाबत एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची अहवाल आणि बाईक टॅक्सी योजनेचा अभ्यास करून राज्यातील सर्व शहरांमध्ये अॅप आधारित बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सादर केला होता. त्यामुळे आता बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा गर्दी असलेल्या शहरांमध्ये प्रवाशांना कमी खर्चात आणि कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.

रिक्षा चालकांचा विरोध….

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा रिक्षा चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात विरोध देखील करण्यात येत आहे. आधीच खुल्या परमिट मुळे मोठ्या प्रमाणात रिक्षाचा धंदा कोलमडला आहे. त्यामध्ये अत्यंत कमी दरामध्ये धावणाऱ्या या बाईक टॅक्सी मुळे रिक्षा चालकांना मोठा फटाका बसणार असल्यामुळे रिक्षाचालक आक्रमकतेने विरोध दर्शवित आहेत.