

*डाॅक्टर इंजिनिअर जरुर व्हा पण प्रशासकीय अधिकारी होण्याचा प्रयत्न करा – दिपक कदम*


नांदेड (प्रतिनिधी) : विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची सगळी धडपड डाॅक्टर इंजिनिअर होण्यासाठी होत असते, ते जरुर व्हा पण त्यापुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख मा. दिपक कदम यांनी केले.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती आणि प्रख्यात लेखक, कवी, पत्रकार, परखड वक्ते आणि सामाजिक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून मा. दिपक कदम हे बोलत होते.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजीराव जमदाडे (परभणी) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशनराव वानखेडे (उमरखेड) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आले. प्रारंभी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले.
आपल्या भाषणात मा. दिपक कदम पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची पहिली सत्ता आल्यानंतर १९९५ मध्ये सर्वप्रथम मान्यवर कांशीरामजी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने लखनौ येथे “भागीदारी भवन” सुरु केले. तिथे प्रशासकीय अधिकारी घडू लागले, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला प्रेरणा मिळाली व नोकरीचा राजीनामा देऊन मी तसेच प्रशिक्षण केंद्र “आंबेडकरवादी मिशन” या नावाने नांदेड येथे सुरु केले, त्याचा देशभर विस्तार केला, तेथून आजपर्यंत एक हजाराहून अधिक प्रशासकीय अधिकारी घडविले आहेत.
बाहेर जर शंभर रुपये लागत असतील तर आंबेडकरवादी मिशनच्या निवासी प्रशिक्षणासाठी नाममात्र फक्त पाच रुपये खर्च लागतो. महाराष्ट्रातील चर्मकार समाजाचे विद्यार्थी इकडे फारसे लक्ष देत नसले तरी देशभरातील असंख्य चर्मकार व बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना मी जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी बनविले आहे. गरीबी व आपल्या परिस्थितीची जाणिव असेल तरच शिक्षणाची तळमळ दिसून येते. बिहारमध्ये सर्वाधिक दारिद्य्र आहे म्हणून तेथे स्पर्धा परिक्षेतील टाॅपर्सची संख्या नेहमीच जास्त असते, असेही शेवटी मा. दिपक कदम म्हणाले.
*समाज भूषण पुरस्कार !*
याप्रसंगी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, किशनराव वानखेडे, पत्रकार रमाकांत कुलकर्णी (परभणी), सोमेश्वर वाघमारे (लातूर), शिवानंद जोगदंड, अनिता देगलूरकर यांनीही आपले विचार मांडले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी नरसिंग गंगाराम सुर्यवंशी, शिवानंद केशवराव जोगदंड आणि सौ. कुसुमताई गणेश गायकवाड यांचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद “समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या नांदेड महानगर अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास संभाजी कांबळे यांची यावेळी निवड करण्यात आली. मा. दिपक कदम, चंद्रप्रकाश देगलूरकर आणि बालाजीराव जमदाडे यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम सकाळी वधू वर परिचय कार्यक्रम घेण्यात आला. त्यात हैद्राबाद, आदिलाबाद, निझामाबाद, लातूर, परभणी, जालना, अर्धापूर, हदगाव, देगलूर, संभाजीनगर, हिंगोली, अंबाजोगाई, बीड, उमरखेड, पुसद, भोकर, धाराशिव ई. ठिकाणचे नियोजित वर, वधू व पालक सहभागी झाले होते. यावेळी जागेवरच कांही लग्न जुळले. येत्या १७ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या सामुहिक विवाह मेळाव्याचा लाभ घेण्याचा संकल्प यावेळी कांही जणांनी केला.
शेवटच्या सत्रात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा साठावा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी इंजि. देगलूरकर यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी बहुजन समाज पक्षाचे प्रा. डाॅ. आनंद भालेराव (किनवट), ॲड. एल. बी. इंगळे, शिवाजी सोनटक्के, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनचे सतिष कावडे, परमेश्वर बंडेवार, शिवाजी नुरुंदे, नागेश तादलापूरकर, भीम आर्मीचे भीमराव विघमारे, समता परिषदेचे दत्तात्रय भालके, नागेश भालके, दादाराव वाघमारे, नारायण अन्नपुरे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे, हणमंत निंबाळकर, विठ्ठल शेट्टी, नारायण रेड्डी निम्मलवाड, अभिषेक साळे, गंगाधर सोनटक्के, हणमंत उतकर, सुनिल खैराव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागतगीत कुसुम गायकवाड आणि विणाताई वाघमारे यांनी गायिले. सुत्रसंचलन जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर यांनी केले. भीमराव वाघमारे, श्रीनिवास कांबळे, सुरेश वाघमारे, सुधाकर खैराव, राजू वानखेडे, संतोष बोराळकर, चंद्रसेन गंगासागरे, संतोष सुर्यवंशी, विपुल देगलूरकर, शिवराज कांबळे, माधव गंगासागरे, राजेश खंदारे, अरविंद येलतवार आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
