गावगाथा

आषाढी एकादशी म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचा अविष्कार – ह.भ.प.पांचाळ महाराज

महापुजेनंतर विठ्ठल रुक्मिणीची भावमुद्रा व कीर्तन सेवा सादर करताना विजय महाराज पांचाळ व सहकारी तसेच श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी केलेली दर्शन रांगेची गर्दी दिसत आहे.

आषाढी एकादशी म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचा अविष्कार – ह.भ.प.पांचाळ महाराज

(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट, दि.१७/७/२४) – ssgavandi007@gmail.com – महाराष्ट्रात वारीची परंपरा ही संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा पासून चालत आलेली परंपरा आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाडी वस्तीवरील भाविक ही चालत आलेली परंपरा अव्याहतपणे सांभाळत आहेत. ही परंपरा म्हणजे महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक लोकशाहीचा अविष्कार असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील कीर्तनकार ह.भ.प. विजय महाराज पांचाळ यांनी केले. ते आषाढी एकादशीनिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित ए.वन चौक येथील उपलप विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत विवेचन करताना बोलत होते. कीर्तन सेवेत पुढे बोलताना हभप विजय महाराज पांचाळ
यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एका क्रांतीपर्वाची सुरुवात या संतांनी केली. त्याची जोपासना करण्याचं काम आज लक्षावधी वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल म्हणून पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात ते केवळ विठ्ठल दर्शनाची आस घेऊनच. पंढरीच्या वाटेने निघालेला वारकरी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शिखरावरचा सोनेरी कळस आहे. त्याची लकाकी आषाढी एकादशीनिमीत्त लाखोंच्या संखेने पंढरीच्या दिशेने पायी वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या या वारीतून दिसून येत असल्याने समस्त भक्तगण या वारीतही विठ्ठलाचे रूप पाहून धन्य होतात असेही विवेचन विजय महाराज पांचाळ यांनी
या कीर्तन सेवेत केले. या कीर्तन सेवेत त्यांना उस्मानाबाद येथील अजानुबाहू वारकरी शिक्षण संस्था, व औसा चिकुर्डा येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी साथ संगत केली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, पुरोहित मंदार महाराज पुजारी, राघवेंद्र बागेवाडीकर, दीपक बागेवाडीकर, मनोहर देगावकर, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय मोरे, स्वाती गाडे-जाधव, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, जयश्री माने, सोनी चव्हाण, रविराव महिंद्रकर, खाजप्पा झंपले, चंद्रकांत सोनटक्के, श्रीमुख जगदाळे, संतोष जमगे, दिपक जरिपटके, प्रसाद सोनार, मल्लीनाथ बोदले, चंद्रकांत डांगे, चंद्रकांत गवंडी आदींसह अनेक भाविक व वारकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. किर्तन सेवेच्या प्रारंभी आज आषाढी एकादशी निमित्त मंदीरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांस वटवृक्ष देवस्थानकडून समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे पुण्यातील सदस्य श्रीमती आरती उपलप यांचे चिरंजीव जयेश उपलप यांच्या हस्ते पुरोहित राघवेंद्र बागेवाडीकर व दिपक बागेवाडीकर, मनोहर देगांवकर यांच्या मंत्रोच्चारात पहाटे ५ वाजता महाअभिषेक महापुजा संपन्न झाली. यानंतर विठ्ठल मंदीर पटांगणात सकाळी ७ ते ९ या वेळेत मराठवाडयातील श्री.विठ्ठल भजनी मंडळ (चिकूर्डा, जि.लातूर) व अजानुबाहू वारकरी शिक्षण संस्था (उस्मानाबाद) यांची भजनसेवा श्रींच्या चरणी समर्पित झाली. तदनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत आळंदी देवाची येथील ह.भ.प. विजय महाराज पांचाळ यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. या एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले होते. एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी व विश्वस्त आरती उपलप यांच्या हस्ते उपवासाचे शाबूू खिचडी, केळी प्रसाद, चहा, कॉफी इत्यादी फराळ प्रसादांचे वाटप करण्यात आले. आज दिवसभर येथील स्थानिक भाविकांसह परगांवाहून आलेल्या भाविकांनी मोठ्या संखेने श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून कृतार्थ झाले.

फोटो ओळ – महापुजेनंतर विठ्ठल रुक्मिणीची भावमुद्रा व कीर्तन सेवा सादर करताना विजय महाराज पांचाळ व सहकारी तसेच श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी केलेली दर्शन रांगेची गर्दी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button