राज्यात अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
मुंबई (प्रतिनिधी): एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी, नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण १४ हजार ६९० अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. अंगणवाडी मदतनीसांची जागा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रमांसह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत. मदतनीसांच्या पद भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरीकडून स्थानिक स्तरावर जाहिराती दिल्या देण्यात आलेल्या आहेत.

या जाहिरातीनुसार मदतनीस पदासांठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयांत अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त पगारे यांनी केले आहे.

